Friday 13 October 2017

विहीगाव जल संधारण प्रकल्प - दुसऱ्या पावसाळ्यानंतर

विहीगाव बंधारा (अशोक धबधबा)
दोन वर्षांपूर्वी विहीगाव मध्ये विवेकानंद सेवा मंडळ या संस्थेसाठी जल संधारण प्रकल्प सुचवण्यासाठी, तयार करण्यासाठी आणि प्रत्यक्ष कामासाठी काम केलं होतं. आज त्याच्या पुढच्या कामासाठी गावात सर्वेक्षणासाठी गेलो असताना या बंधाऱ्याला भेट दिली. वर आहे तो त्याचाच फोटो. अशोका चित्रपटात दाखवलेला हाच तो धबधबा. एवढं पाणी असूनही गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई व्हायची. त्यावर उपाय म्हणून जी उपाययोजना केली गेली त्यातील एक भाग म्हणजे या बंधाऱ्याची दुरुस्ती आणि बळकटीकरण.

बाजूच्या फोटोत दिसतेय ती दोन वर्षांपूर्वीची अवस्था. गाळाने पूर्ण भरून गेलेला आणि भेगाळलेला बंधारा. सर्व बंधाऱ्यातून पाणी नीट पाझरून जायचं. याचं बळकटीकरण आणि दुरुस्ती करणं हा उपाययोजनेचा एक भाग होता.








बाजूच्या फोटोत आहे तो दुरुस्ती केल्यानंतर दोन वर्षांनी आज काढलेला फोटो. आज या बंधाऱ्यामध्ये जवळजवळ १,२०,००,००० लिटर पाणी आहे. साधारण ३०० मीटर पर्यंत हा पाणीसाठा विस्तारलेला आहे. या बंधाऱ्यातून काही पाणी अजूनही झिरपताना दिसतंय पण ते बंद करण्याची प्रक्रिया ठरली आहे. त्यामुळे ते बंद होईल. हा आणि याच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला असलेला एक बंधारा, हे दोन्ही मिळून आज गावात
साधारण दोन कोटी लिटर पाणी उपलब्ध आहे.

मात्र, हे पाणी फक्त साठणं हे काही या प्रकल्पाचं उद्दिष्ट नव्हतं आणि नाही. ही पहिली पायरी आहे. या पाण्याचा वापर करून गावातील तरुण शेतीतून जेव्हा पैसे मिळवतील तेव्हा हा प्रकल्प यशाकडे वाटचाल करतोय असं म्हणता येईल.
या कामासाठी भारत विकास परिषद, अनेक सुहृद आणि मित्रमंडळी यांचा मोलाचा सहभाग आणि आर्थिक मदत मिळाली म्हणून विवेकानंद सेवा मंडळ हा प्रकल्प वेळेत आणि यशस्वीपणे पूर्ण करू शकलं. आता जबाबदारी कार्यकर्ते आणि गावकरी तरुणांची आहे. सुरुवात तर झालीय, बघूया या वर्षी आणखी काय आनंद मिळतोय ते!

आत्ता शेअर केलीय ती एक आनंददायक आठवण! कामाच्या सफलतेची!
डॉ उमेश मुंडल्ये