Monday 27 March 2017

जल साक्षरता, नदी पुनरुज्जीवन आणि लोक सहभाग - काळाची गरज

जल साक्षरता, नदी पुनरुज्जीवन आणि लोक सहभाग - काळाची गरज

वालधुनी नदी परिक्रमा 

हा लेख लिहावा का? का लिहावा? यावर कालपासून खूप विचार करून शेवटी लिहायला घेतला. कारण अशा वस्तुस्थिती दाखवणाऱ्या लेखांची आवश्यकता आहे असं मनापासून वाटलं.
२६ मार्चला उल्हासनगर आणि डोंबिवली येथे वालधुनी नदी पुनरुज्जीवन मोहिमेची सुरुवात झाली. डॉ राजेंद्रसिंग, महाराष्ट्र नेचर पार्कचे अविनाश कुबल, इंस्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे पदाधिकारी आणि सभासद, चांदीबाई कॉलेज, विविध संस्था, दहिसर नदी पुनरुज्जीवन समितीचे सदस्य आणि लोकांच्या सहभागातून सकाळी ८ वाजता नदीची परिक्रमा करून (उल्हासनगर भागातील) त्यानंतर चांदीबाई कॉलेज मधे एक सभा होऊन त्यात या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी काय आणि कसे प्रयत्न करावेत या दृष्टीने काही मुद्द्यांवर चर्चा झाली.
संध्याकाळी डोंबिवली जिमखाना येथील सभागृहात या विषयावर वेगवेगळी प्रेझेंटेशन झाली. शेवट डॉ राजेंद्रसिंग यांच्या मनोगताने झाला.
या दोन्ही घटनांमधे जे अनुभवलं ते सर्वांना सांगावं हा या लेखाचा हेतू.
उल्हासनगरची लोकसंख्या काही लाखांत आहे. नदी प्रचंड प्रमाणात प्रदूषित आहे. कारखाने आणि निवासी विभागातील सांडपाणी सर्रास नदीत सोडलं जात आहे. नदीच्या पाण्याचा रंग, त्याला येणारी दुर्गंधी, हे सर्व त्या नदीवर जे अत्याचार केले जात आहेत ते स्पष्टपणे दाखवत आहेत. विविध सरकारी योजना तयार होऊन, त्यातून काही योजनांमधे खर्च होऊन गेलाय पण नदीची परिस्थिती आणखी वाईट होत चाललीय.
या सर्व पार्श्वभूमीवर पाणी क्षेत्रातील नोबेल समजले जाणारे स्टॉकहोम वॉटर प्राइज मिळालेले, जगावर चांगला परिणाम घडवणाऱ्या ५० लोकांमधे ज्यांचं नाव घेतलं जातं ते, ७ नदया यशस्वीपणे पुनरुज्जीवित करणारे डॉ राजेंद्रसिंग या कामात मदत करायला, सहभागी व्हायला येतात, तेव्हा त्यांच्यासमोर जेमतेम १०० माणसं असतात, आणि त्यातली ५० टक्के बाहेरगावातून आलेली असतात, स्थानिक लोक फारच कमी दिसतात, हे फारच धक्कादायक होतं. त्यातल्या त्यात जमेची बाब म्हणजे उल्हासनगरच्या २ नगरसेविका यात सहभागी झाल्या होत्या.
संध्याकाळी तर आणखी कठीण परिस्थिती होती. डोंबिवली जिमखाना मधल्या कार्यक्रमाला उपस्थिती जेमतेम ५०-६० लोकांची. त्यात नदीच्या पुनरुज्जीवनाबद्दल उपाय सुचवणारे कमी.
या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती, लोकांची मानसिकता दाखवते. हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात आयोजक कमी पडले किंवा अशा कार्यक्रमात रविवार संध्याकाळ वाया घालवावी असं लोकांना वाटलं असावं का असाही प्रश्न पडतोय.
पाणी, पर्यावरण, निसर्ग याकडे आपण कसं बघतोय याचं हे निदर्शक आहे. या कार्यक्रमाला माणूस जोगेश्वरीहून आला होता, म्हणजे इच्छा असेल तर हे शक्य आहे.
डॉ. राजेंद्रसिंगजी यांनी सांगितल्याप्रमाणे, "नदी, नीर और नारी का सम्मान ही समाज को प्रगती की तरफ ले जाता है", या विधानावर खूप गांभीर्याने काम करायची गरज आहे.
पाणी, पाण्याचे स्त्रोत, नदया, तलाव इत्यादि जीवनवाहिनी जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायची गरज आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय वातावरण तयार करून  ठेवतोय याचा किमान आता तरी विचार करून, आवश्यक कृती करायची वेळ आलीय.
काही लाखांची लोकवस्ती असलेल्या शहरात सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी एवढया महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करायला एक अनुभवी मार्गदर्शक येतो आणि त्याची गंधवार्ताही सामान्य नागरिक, प्रतिष्ठित, स्वयंसेवी संस्था, पत्रकार यांना नसते किंवा त्याचं महत्व यापैकी कोणाला वाटत नाही हे माझ्या दृष्टीने खूप गंभीर आहे. आणि अशा वागण्याचे दुष्परिणाम आपण भोगत असतानाही आपल्या वागण्यात बेफिकीरी आहे, योग्य काम करायची इच्छा दिसत नाहीये, जाणीव दिसत नाहीये, यावरून भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज येतोय.
अजूनही वेळ पूर्णपणे गेली नाहीये. जागे व्हा. अशा सर्व प्रयत्नात सहभागी व्हा. आपण आत्ता काही योग्य उपाय केले तरच पुढच्या पिढीला काही चांगल्या गोष्टी शिल्लक राहतील.
आपण या जगाचे मालक नाही, मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हा वारसा आपल्याला द्यायचाय की आहे ते आळस, दुर्लक्ष, बेफिकीरी यात संपवून सगळं भकास  करून टाकायचं हे नक्की करून त्याप्रमाणे प्रत्यक्ष काम करायची गरज आहे.



Monday 20 March 2017

लोक सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा सांस्कृतिक वारसा - देवराई

लोक सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा सांस्कृतिक वारसा - देवराई
डॉ. उमेश मुंडल्ये  

वेगाने वाढणारी शहरं, औद्योगिकीकरण, लोकसंख्येचं ध्रुवीकरण, या आणि अशा अनेक गोष्टींमुळे निसर्गाचा समतोल ढळतोय आणि त्यामुळे पाणी, जंगलं, एकूणच जीवसृष्टीवर त्याचा खूप वाईट परिणाम होतोय. यात सर्वात वाईट भाग असा की या गोष्टीचं आकलन खूप कमी लोकांना दिसते आणि या गोष्टींवर प्रत्यक्ष काम करून योग्य प्रकारे संवर्धन आणि संरक्षण करणं हे तर फार दुर्मिळ आहे.
वाढती लोकसंख्या, शहरीकरण, आणि मानवकेंद्रित विकास यामुळे शेतीची जमीन, जंगलं कमी आणि विरळ होत चालली आहेत, पाण्याचे स्त्रोत, वृक्षसंपदा कमी होत चालली आहे. याचा गम्भीर परिणाम पर्यावरण आणि नैसर्गिक स्त्रोतांवर होतोय. 
शिल्लक असलेली जंगलं टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक कायदे केले गेलेत आणि अजूनही केले जातायत. परन्तु, जैवविविधतेचे महत्त्व फार कमी लोकांपर्यंत पोहोचले आहे. आपण जीवसृष्टीच्या केंद्रस्थानी नसून केवळ एक भाग आहोत आणि फ़क्त आपणच निसर्गाचं शोषण करतोय (माणसा व्यतिरिक्त इतर कोणताही प्राणी निसर्गाचं शोषण करत नाही) त्यामुळे जैव विविधता आणि नैसर्गिक स्त्रोत यांचं संवर्धन आणि संरक्षण ही आपली जबाबदारी आहे हे ओळखून माणसाने कृती करायला हवी. त्यासाठी जाणीव जागृति करत राहण्याची गरज आहे. 
जरी सध्या अनेक लोक पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण यासाठी काही उपाय सुचवत असले तरी त्यातले बरेचसे उपाय हे मानवाला केंद्रस्थानी मानून चाललेत. त्यामुळे योग्य परिणाम होत नाहीये. तात्पुरती मलमपट्टी करणं चालू आहे. बहुतेक ठिकाणी "संरक्षण दुसर्याने करावं, मी उपभोग घेईन" ही मनस्थिती दिसतेय.
सरकारी पातळीवर संरक्षणाचा भाग म्हणून विविध भाग संरक्षित करणं (अभयारण्य, National Parks, Biosphere Reserves, Gene Banks, वगैरे) आणि वेगवेगळे कायदे करणं हे दिसते. पण यात या सर्व प्रक्रियेतून माणूस बाजूला काढला जातो. त्यामुळे हे उपाय लोक सहभागाविना अयशस्वी होताना दिसतात. 
दुसरीकडे, शहरांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बांधली जाणारी धरणं, त्यामुळे होत असलेली मातीची धूप, शहरांचं बाजूच्या शेतजमिनीवर होत असलेलं आक्रमण, त्यामुळे जंगलं तोडून केली जाणारी शेती, वैध, अवैध खाणी, जंगलांमधून गोळा केलं जाणारं वनोपज, अवैध आणि बेलगाम चराई या गोष्टींमुळे वन संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसते. त्यातच जंगलं कमी झाल्याने वन्य प्राण्यांनी जवळच्या मानवी वस्तीवर अन्नासाठी हल्ले करणं, त्यात मनुष्य हानी होणं, त्यामुळे, लोकांनी वन्य प्राण्यांना मारणं, इत्यादि गोष्टी होतात. त्यामुळे सर्व संरक्षण आणि संवर्धन प्रक्रिया वादात सांपडते. या प्रकारांमुळे साधी जंगलं तर जाऊ देत, संरक्षित जंगलांचं संरक्षण कठीण गोष्ट झालीय. 
यातच भर म्हणून कि काय, मिश्रवनं निरुपयोगी समजून ती तोडून तिथे पैसे देणाऱ्या झाडांची लागवड केली जातेय आणि सरकार विविध सवलती आणि योजनांद्वारे त्याला पाठिंबा देत आहे. यात पर्यावरण संतुलन कुठेच विचारात घेतलं जात नाहीये. त्यामुळे ही विविधता आणखी कमी होत चाललीय.     
सुदैवाने, लोक सहभागातून जीव विविधतेच संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारताला परंपरेने एक सुदृढ आणि पुरातन वारसा दिला आहे. एखादी गोष्ट जर दीर्घकाळ यशस्वीपणे चालू ठेवायची असेल तर ती लोकांच्या जगण्याचा एक भाग झाली पाहिजे या गोष्टीची जाण आपल्या शहाण्या पूर्वजांना असावी. त्यांनी निसर्गातील अनेक घटक देव किंवा देवाचे प्रिय घटक मानून त्यांचं संरक्षण करण्याची प्रथा वेगवेगळ्या कारणांनी चालू केली. यात नद्या, तलाव, विविध डोंगर शिखरं, विविध वनस्पती आणि प्राणी, इत्यादि गोष्टींना धार्मिक महत्त्व देऊन त्यांचं संरक्षण आणि संवर्धन पिढ्यानपिढ्या केलं. यातला एक आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे "देवराई". 
देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. हे जंगल देवाला अर्पण केलेलं असल्याने याची तोडकेली जात नाही. या जंगलातील सर्व गोष्टी धार्मिक भावनेने पिढ्यानपिढ्या सांभाळल्या जातात. हे देवाचे जंगल आहे त्यामुळे यातील कोणत्याही गोष्टीचा वापर व्यापारासाठी करायचा नाही, कोणतंही झाड तोडायचं नाही या ठाम भावनेने या देवरायांच संरक्षण केलं जातं. देवराईला कुंपण किंवा संरक्षक भिंत नसते, कोणी राखणदार नसतात, पण तरीही केवळ धार्मिक भावनेने या जंगलांच रक्षण केलं जातं. सामाजिक बंधन हा सर्वात जास्त परिणामकारक ठरणारा घटक आहे. 

देवराई कशी दिसते - 
एखाद्या परिसरात फिरताना उजाड परिसरात किंवा शेतांमध्ये अचानक चांगला जंगलाचा राखलेला भाग दिसला कि ज्यात शिरणं कठीण आहे किंवा जो एकदम वेगळा दिसतोय किंवा एखादं उत्तम दर्जाचं जंगल आहे, समजावं कि ही देवराई आहे.
देवराई नुसती फोटो बघून किंवा वर्णन वाचून कळत नाही, प्रत्यक्ष अनुभवण्याची आहे. कोणत्याही चांगल्या देवराईत शिरल्यावर आपला बाकी जगाशी संपर्क जवळपास तुटतो. आतलं आणि बाहेरचं तापमान, आर्द्रता यात जाणवण्याएवढा फरक अनुभवायला मिळतो. आत शिरल्यावर आपल्याला दिसतात ते उंचच उंच वृक्ष, त्यावर असणार्या अनेक आकाराच्या वेली, गच्च झाडोरा आणि विविध पक्षी, प्राणी यांचे आवाज आणि बरेचदा दर्शन. कुठे तरी वाहणार्या ओढ्याचा किंवा नदीच्या पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, माकडं, भेकरं, पिसोरी, मोर, ककणेर, घुबड, दयाळ, नंदन नाचण, राजगिधाड, अशा अनेक पशुपक्ष्यांच दर्शन होतं. काही देवरायांमधे तर शेकरू आणि तिची घरटी दिसू शकतात. घाटमाथ्यावरच्या देवराईमधे अनेकदा सर्पगरुड़ पहायला मिळतो.  
देवराईच्या मध्यावर किंवा एका बाजूला एखादं मंदिर असतं. निसर्गातूनच आलेला देव किंवा देवी असते. ती त्या देवराईची आणि गावाची राखण करते. एखादा झरा किंवा ओढा असतो. क्वचित एखादी नदी उगम पावते. अनेक दुर्मिळ झाडं दिसतात. एकून वातावरण एकदम वेगळंच असतं, कोणीही भारावून जावं, शांत व्हावं अशी किमया हे देवराई मधलं वातावरण घडवून आणतं.


देवराई कुठे आढळते? - 

सर्वसाधारणपणे, देवराई गावाच्या सीमेवर आढळते. पण याचा अर्थ ऐसा नाही की देवराई एखाद्या विशिष्ट ठिकाणीच आढळते. देवराई गावात असू शकते, गावाच्या सीमेवर असू शकते, गावापासून लांब असू शकते, जंगल आणि गाव याच्यामध्ये असू शकते. अनेक ठिकाणी तर एकाच गावाच्या प्रत्येक वाडीत एक याप्रमाणे देवराया दिसून येतात. ही सार्वजनिक जंगलं आहेत. बहुतांश देवरायांमधे पाण्याचा एक तरी स्त्रोत असतो.
महाराष्ट्राचा विचार केला तर देवराया पश्चिम घाटाच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसंच सातपुडा डोंगर रांगा, यवतमाळ, नांदेड़ जवळील आदिवासी भाग, भंडारा, गड़चिरोली, वगैरे भाग जिथे आदिवासी वस्ती आहे त्या भागात देवराया आढळतात. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या भागात देवरायांची संकल्पना आढळत नाही किंवा त्याबद्दल काही नोंद नाहीये.
आजपर्यंत मी केलेल्या संशोधनात ३७८३ देवारायांची नोंद केली आहे.  मुंबई मध्ये तर एक देवराई समुद्रामधल्या बेटावर आहे. तिथे ओहोटीच्या वेळेला चालत जाता येतं. या देवराईत गोड्या पाण्यातील झाडं दिसतात.  
देवराई किती आकाराची असावी याचा काही नियम नाहीये. कधी ती एका झाडाची असते (खरंतर एक मुख्य वृक्ष आणि त्यावर असंख्य वेली असं चित्र दिसतं). किंवा कधी ती १०० एकरापेक्षा मोठी असते. पण, सर्वसाधारणपणे देवराई १० गुंठे ते १० एकर एवढ्या परिसरात पसरलेली आढळते. बरेचदा, गावाच्या मध्ये असणारी किंवा सीमेवर आढळणारी देवराई लहान असते पण हा नियम नाहीये.  देवराईचं महत्त्व हे तिच्या आकारमानापेक्षा त्यात मिळणार्या प्रजातींवर अवलंबून असतं. मला दिसलेली सर्वात मोठी देवराई २०० एकरपेक्षा मोठी आहे. 
देवराई मधील देव - 
देवराई मध्ये असणारे देव हे बरेचदा निसर्गातून आलेले देव असतात. उदा. वाघजाई, काळकाई, शंकर, भैरी, वगैरे. अनेक देवरायांमध्ये हे देव उघड्या आभाळाखाली किंवा एखाद्या झाडाच्या खाली, पण उघड्यावर, असतात. देवराई मधल्या कोणत्याही गोष्टीची तोड झाली तर हे देव त्या दोषी माणसाला आणि त्याच्या वंशाला शिक्षा देतात अशी त्या गावातल्या लोकांची श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेच्या आधारेच या देवराईचं रक्षण केलं जातं. अनेक देवरायांमध्ये तर देवाऐवजी भूत राखणदार असल्याचं बघायला मिळालं. 
जसजशी सुधारणा होत गेली किंवा शहरातल्या लोकांचा प्रभाव पडला किंवा राजकीय सत्तेचा किंवा अन्य धर्मीय सत्तेचा प्रभाव पडला तिथे तो या मंदिरांवरही दिसतो. पण एक गोष्ट नक्की, कि ही संकल्पना शेकडो वर्षांच्या परकीय आणि परधर्मीय सत्तेतही टिकून कायम राहिली. 
देवराई मधील जैवविविधता - 
देवराई तिथल्या घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहेच पण ती तिथल्या जैवविविधतेसाठी जास्त प्रसिद्ध आहे. हे एक उत्तम दर्जाचं जंगल असतं, देवराई मध्ये त्या परिसरातील मूळ जंगलातील टिकून राहिलेली वन संपदा असते. कंदमुळे, गवताच्या अनेक जाती, जमिनीवर पसरणार्या वनस्पती, लहान मोठी झुडुपे, लहान मोठी झाडे, खूप उंच वृक्ष, त्यावर वाढणार्या वेली आणि इतर वनस्पती, शेकडो प्रकारचे पक्षी, वनस्पती, कीटक, फुलपाखरे, शेवाळे, बुरशी, जंगली प्राणी इत्यादि जीव सृष्टी देवराई अधिक समृद्ध करतात. अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक देवराईत सुरक्षित वातावरणात मोठ्या संख्येने आढळतात. 
आत्तापर्यंत मी केलेल्या संशोधनात वनस्पतींच्या सुमारे १४५० हून जास्त प्रजाती नोंदण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, सुमारे १४० प्रकारचे  पक्षी, ८० हून जास्त प्रकारची फुलपाखरे, १८ हून जास्त प्रकारचे सरपटणारे प्राणी, भेकरे, पिसोरी, हरणे, साळींदर, खवले मांजर, माकडे, नीलगाय, गवा, रान मांजर, बिबट्या, इत्यादि वनजीवन सुरक्षितपणे जगताना दिसते.      
 देवराई मधील औषधी वनस्पती - 

देवराई तिथल्या औषधी वनस्पतीच्या भांडारासाठी प्रसिद्ध आहे. बाहेरच्या भागात दुर्मिळ असणारी झाडं इथे चांगल्या दर्जाची आणि मोठ्या प्रमाणावर आढळतात. गावातील जाणकार त्याचा वापर पैसे न घेता करतात. अनेक देवरायांमध्ये हल्ली झाड न तोडता बाकी गोष्टी वापरल्या जातात. 
इथे हिरडा, बेहेडा, आवळा, सर्पगंधा, गुळवेल, कावळी, धायटी, मुरुडशेंग, बकुळ, खैर, अमृता, अशोक, चित्रक, गेळा, गारबी, उक्षी, वाळा, कडू कवठ, रामेठा, पळसवेल, मोह, कुंभा, शिकेकाई, रिठा, इत्यादि शेकडो प्रकारच्या प्रजाती मिळतात.
एक गोष्ट नक्की की देवराई मधील कोणत्याही गोष्टीचा व्यावसायिक वापर करायला बंदी असते.
देवराई आणि गाव - 
देवराई हे गावाचं सांस्कृतिक केंद्र असतं. गावाचे सर्व उत्सव सार्वजनिकरित्या देवराई मध्ये साजरे केले जातात. अनेक गावांमध्ये मासिक ग्राम बैठक देवराई मध्ये घेतली जाते आणि त्यात गावाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय सामुहिकपणे घेतले जातात. गावातील शाळा आणि मंदिराची दुरुस्ती या २ गोष्टींसाठीच देवराई मधील एखाद दुसरे झाड तोडायला ग्रामसभा क्वचित परवानगी देते. अन्यथा, झाड तोडणार्या व्यक्तीला दंड भरावा लागतो. एकूणच, गाव देवराई उत्तम रित्या जपतं.
काही ठिकाणी काही विशेष नियम असतात, उदा. तुम्ही देवराई मध्ये कोयता घेऊन जाऊ शकता पण कुर्हाड न्यायला बंदी आहे. याचं कारण सोपं आहे, कोयत्याने वाळलेल्या फांद्या तोडता येतात, कुर्हाड वापरून झाड तोड़ता येतं. किंवा, काही देवरायांमध्ये अनवाणी जायचं बंधन आहे. हे अजुन एक सोपा उपाय आहे लोकांना लांब ठेवायचा. कारण तुम्ही जंगलात फार काळ आणि अंतर अनवाणी जाऊ शकत नाही.
कारणाशिवाय त्या भागात जायचच नाही अशी योजना यामागे दिसून येते. त्यामुळे, जंगल दाट आणि चांगलं रहायला मदत होते.

देवराई आणि पाणी - 

बहुतेक देवरायांमधे पाण्याचा एक तरी स्त्रोत असतो. मग तो झरा असेल, विहीर असेल, तलाव असेल, ओढा असेल, नदी असेल, खरंतर मला तरी असंच वाटतं की देवराई संकल्पना ही पाण्यासाठीच तयार केली गेली असावी. उत्तम राखलेलं जंगल, त्यात लोकांचा फार कमी वावर आणि चांगल्या जंगलामुळे होणारे जलसंधारण आणि मृद्संधारण.
आजही सह्याद्री मधे अनेक गावांत अनेक देवराया अशा आहेत की गावातल्या विहिरी आटतात पण गावापेक्षा उंच असलेल्या देवराई मध्ये वर्षभर पाणी मिळतं. कित्येक ठिकाणी संपूर्ण गाव त्या एकाच स्त्रोतावर अवलंबून असतं.
कोकणात अनेक ठिकाणी देवरायांमध्ये असलेल्या स्त्रोताचे पाणी हे गावापर्यंत नेलेलं आढळतं. त्या गावातील लोकांना माहिती असते की जोपर्यंत देवराई आहे तोपर्यंत पाणी मिळणार आहे. त्यामुळे गाव देवराई संरक्षण जास्त काळजी घेऊन करतं. देवराई जर गावापेक्षा उंच ठिकाणी असेल आणि चांगली राखलेली असेल तर त्या गावातील विहिरी जास्त काळ पाणी देतात असाही अनुभव आहे.
सध्याची परिस्थिती - 
आता, एवढे सगळे फायदे असूनही देवराई पुढे कोणते धोके आहेत हा प्रश्न लगेच मनात येतो.

१. सध्या स्वार्थ आणि प्रगती याचा पाठलाग करताना धार्मिक भावना वगैरे गोष्टी कमी होत चालल्या आहेत. मोठ्ठं मंदिर, त्यापुढे बाग यासाठी देवरायांमध्ये असलेलं जंगल तुटायला लागलं आहे. सर्व परत समजावून सांगायची गरज निर्माण झाली आहे.
२. याव्यतिरिक्त, वेगाने होणारा विकास देवराई कमी व्हायला किंवा नष्ट व्हायला कारणीभूत होतोय.
३. खाणींमुळे होणारं नुकसान
४. शेत जमिनी आणि वाढत्या शहरांच अतिक्रमण यामुळे होणारं नुकसान 
देवराई संरक्षण कसं करता येईल? - 
देवराई या संकल्पनेमध्ये लोकसहभागातून रक्षण केलं जातं. ही पिढ्यान पिढ्या यशस्वीपणे चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन यासाठी या परंपरेचा उपयोग करून घेतला तर यश मिळण्याची जास्त शक्यता आहे.
देवराईच्या माध्यमातून जैवविविधता जपण्यासाठी या गोष्टी करता येतील -
१. स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने संरक्षण
२. स्थानिक लोकांच्या सहाय्याने संरक्षण
३. देवराई भोवती देशी वनस्पती लागवड करून त्याचा वापर दैनंदिन वापरासाठी करणं
या सर्व प्रक्रियेमध्ये कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक लोकसहभाग, आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीवरच सर्व प्रयत्नांचं यश अवलंबून आहे. आपण निसर्गाचा एक भाग आहोत आणि आपण गरजेशिवाय सुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती वापरत असतो, त्यामुळे आपल्यावर या सर्व गोष्टी टिकवण्याची जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन आणि ठेवून माणसाने जैवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे.
या सर्व प्रयत्नांसाठी देवराई आपल्याला मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडणार आहे.
    

डॉ. उमेश मुंडल्ये

फोटो क्रेडीट - डॉ. उमेश मुंडल्ये

आज जागतिक वन दिनाच्या निमित्ताने हा लेख एका वर्तमानपत्रासाठी लिहिला होता. परंतु, त्यांना बाकी बातम्यांमुळे जाएगा न मिळाल्याने तो परत घेऊन इथे टाकतोय.
पर्यावरण या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन या उदाहरणातून सहज कळतो. 



                       

                

Thursday 2 March 2017

सरकारी पातळीवरील ठोकळेबाज उपाय - उपाय की अपाय?

सरकारी पातळीवरील ठोकळेबाज उपाय  - उपाय की अपाय?

४ दिवसांपूर्वी एका पार्लेश्वर रोटरी क्लब बरोबर शहापूर तालुक्यातील माळ नावाच्या गावात गेलो होतो. गावाला पाण्याची टंचाई आहे आणि ३ महिने पाण्यासाठी वणवण करावी लागते. गाव उंच पठारावर आहे आणि सर्व बाजूंनी उतार असल्याने पाणी वाहून जाते आणि टंचाई निर्माण होते अशी परिस्थिती आहे. गेली २ वर्षं हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पार्लेश्वर रोटरी क्लब बरोबर प्रयत्न करात आहोत. यावर्षी बांधकाम करून पाणी साठवणं आणि जमिनीत मुरवणं यासाठी काम चालू करायच्या तयारीने गेलो असताना धक्कादायक प्रकार दिसला. तो लोकांपुढे यावा आणि अशा प्रकारामुळे होणारं नुकसान लोकांपुढे यावं म्हणून हा लेखप्रपंच. 
माळ गावात एक विहीर आहे जी मार्च मधे कोरडी होते. त्यानंतर गावकरी साधारण ८०० मीटर अंतरावर  असलेल्या बंधाऱ्याकडे जातात पाण्यासाठी. तिथे गुरं येतात, कपडे धुतले जातात, भांडी घनसाली जातात. त्यामुळे पाणी लवकर खराब होतं. सुदैवाने, तिथे एक जवळजवळ बारमाही झरा आहे, ज्याचं पाणी पिण्यासाठी वापरता येतं. बंधारा १२-१३ वर्षं जुना आहे. खूप गळती आहे, भिंत फुटली आहे, गाळ साठलाय, त्यामुळे पाणी जास्त काळ टिकत नाही आणि दर्जा वाईट असतो. त्यातून गावात आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. 
अभ्यास करून एक योजना तयार करून आम्ही कामाला लागलो. या योजनेत विहिरीची दुरुस्ती करणं, विहिरीच्या खालच्या पातळीवर भूमिगत बंधारा बांधणें, जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढणे, झऱ्यासमोर कुंड बांधून त्याचं आयुष्य २ महिन्यांनी वाढवणे आणि एक नविन बंधारा बांधणे, या गोष्टी आहेत. 
आत्ता गावात गेलो तेव्हा पाहिलं की जुन्या बंधाऱ्याच्या जवळ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नविन विहिरीचं काम अचानक सुरु झालंय आणि ते कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरु आहे. अत्यंत चुकीच्या जागी २२ फूट व्यासाची आणि ३० फूट खोलीची विहीर करायचा प्रयत्न आहे. सध्या फ़क्त ५ फुट खोल खणून झालंय आणि दगड लागला आहे म्हणून काम थांबलंय. 
गावकऱ्यांमधे चर्चा होती की आता सुरुंग लावून, दगड फोडून ३० फुट खोल जाणार कारण तसं कॉन्ट्रैक्ट मधे ठरलंय. हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला. यात अनेक धोके आहेत. 
१. विहीर चुकीच्या जागी, उतारात, झरे नसलेल्या जागी होतेय, त्यामुळे खर्च वाया जाणार 
२. सुरुंग लावून विहीर खोल करून उपयोग नाही कारण झरे नसल्याने ती पाण्याची टाकी होणार
३. जुना कमकुवत बंधारा जेमतेम १५० मीटर वर आहे. सुरुंग लावले की त्या धक्क्याने बंधाऱ्याला धोका पोहोचू शकतो आणि सध्याची परिस्थिति पाहता तो पडण्याचीच शक्यता जास्त आहे 
४. या उद्योगामुळे आहे ते पाणी वाहून जाण्याची भीती आहे 
५. गावकऱ्यांना एवढाच पाण्याचा स्त्रोत असल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याची परिस्थिती बिकट होणार आहे 
६. सरकारी पैसा, माणसांचे श्रम वाया जाणार आहेत 
७. यानंतर तिथे कोणतंही पाण्याचं काम होऊ शकणार नाही 
दुर्दैवाने, हे ना लोकांना कळतंय, ना कॉन्ट्रक्टरला, ना सरकारी पातळीवर काही विचार दिसतोय. सर्व संबन्धित लोकांना ही माहिती दिलीय पण अजुन काही प्रतिसाद नाहीये. 
एकीकडे स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार याच्या मदतीने पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न चालु आहेत आणि दुसरीकडे सरकारी पातळीवरील अनास्था आणि स्थानिक परिस्थितीचा अभ्यास न करता टारगेट पूर्ण करण्यासाठी केली जाणारी कामं, यामुळे खूप प्रतिकूल वातावरण तयार होतंय. 
स्थानिक भौगोलिक परिस्थिती, लोकांची गरज, व्यवहार्य योजना यावर योग्य माणसांचा सल्ला घेऊन काम केलं तर अशी विचित्र परिस्थिती निर्माण होणार नाही हे लक्षात घ्यायची आवश्यकता आहे.