Tuesday 27 December 2016

डोंबिवली - एक प्रवास भाग 3

डोंबिवली - एक प्रवास भाग ३ 
भलत्याच वेगाने होणारं शहरीकरण अनेक समस्या आणि अडचणी घेऊन आलं. मुंबईपासून जवळ असलेलं एक गाव असल्याने, मुंबईमधले जागांचे भाव वाढायला लागल्यावर तिथे राहणारी बरीच मध्यमवर्गीय नोकरदार माणसं पूर्वीपासूनच इकडे राहायला आली होती. आता डोंबिवली शहर हे मुंबई आणि उपनगरातील बऱ्याच महाविद्यालयांना आणि शाळांना शिक्षक, सरकारी आणि खाजगी आस्थापनांसाठी अधिकारी आणि कारकून, उद्योगांसाठी लागणारं मनुष्यबळ (विशेषतः ज्याला "white collared" म्हटलं जातं ते) पुरवत होतं. शहरातील बहुसंख्य कमावती माणसं ही दिवसभर कामाला ठाण्या मुंबईला असायची. त्यामुळे डोंबिवली हे शहर नोकरदारांचं शहर म्हणून प्रसिद्ध झालं होतं. तसंच ते अलिप्त लोकांचं शहर किंवा निर्विकार लोकांचं शहर झालं होतं. काहीही झालं तरी आपलं "सोशिक डोंबिवलीकर" नावाचं लादलेलं बिरुद सांभाळण्यात स्वतःची कर्तव्यं आणि अधिकार विसरलेले लोक. 
याचा एक परिणाम असा झाला की गावात घडणाऱ्या गोष्टी या झाल्यानंतर किंवा खूप उशिरा कळायला लागल्या. गावातील सुधारणा, होणारी वाढ, होत असलेला विकास, हे सर्व नोकरदार डोंबिवलीकरांना अनेकदा उशिरा कळत गेलं. त्यातच शाळेत असताना आपण शिकत असलेलं नागरिक शास्त्र, आपण फक्त २० मार्क असलेला विषय, इतक्याच आवडीने शिकलो असल्याने ते प्रत्यक्ष आचरणात आणायचा तसा काही फारसा डोळस प्रयत्न नागरिकांकडून होताना दिसला नाही, अगदी आजही दिसत नाही. त्याला "वेळ नाही" हे कारण दिलं जातं. 
शहराची वाढ होताना, विशेषतः शहर म्हणून वाढ होताना मूलभूत पायाभूत सुविधा चांगल्या असायला हव्यात आणि त्या नीट पुरवायच्या असतील तर आधी शहराचं नियोजन वगैरे गोष्टी करायच्या असतात आणि त्या फक्त कागदावर करून काहीच घडत नाही तर त्यानुसार सरकारी यंत्रणांनी आणि नागरिकांनी वागायचं पण असतं हे बहुदा नागरिकशास्त्र अभ्यासात option ला टाकल्यामुळे बहुसंख्य लोकांना बहुदा कळलंच नसावं. 
नवीन बांधकाम होताना जुनी झाडं तोडली गेली, जुन्या विहिरी, तलाव, शेतं वगैरे नाहीसं होत गेलं आणि तयार झालं ते काँक्रिटचं एक अनियंत्रित, अस्ताव्यस्त वाढत चाललेलं जंगल. खरंतर याला cancerous growth हा जास्त योग्य शब्द म्हणता येईल.  
त्यामुळे आता संध्याकाळी मुख्य रस्त्यांवर  मोर्चा निघाल्यासारखी किंवा मिरवणुका निघाल्यासारखी वाहनांची रांग, त्यात फुटपाथ फेरीवाल्यांनी अडवल्यामुळे रस्त्यांवर चालण्याचा हक्क बजावणारे पादचारी, फेरीवाल्यांना आणि राजकीय नेत्यांना नावं ठेवून नंतर त्याच फेरीवाल्यांकडून (जवळ पडतं, वेळ वाचतो म्हणून) खरेदी करणारे सुशिक्षित नागरिक अशा सर्व शिस्तप्रिय नागरिकांचा एक अप्रतिम कोलाज तयार होताना दिसतो. हे दृश्य सुट्टीच्या दिवशी आणि जिथे सण आणि उत्सव सार्वजानिकरित्या साजरे होतात तिथे तर आणखी रंगतदार तर होतंच। पण उत्सवात त्याला एक जोरदार आवाजही येतो जो सर्वांच्या कानाच्या पडद्यांची परीक्षा पण घेतो. हे सर्व सहन करणं आणि त्यात आनंद शोधणं हे पण नागरिकांचं एक कर्तव्य असतं.   
आम्ही कॉलेजमधे असताना कॉलेजच्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं दिसायची. आज खूपच दुर्मिळ वाटणारी तुतीची झाडं MIDC मधे सहज दिसायची. मी वनस्पतिशास्त्रात पदवी घेत होतो. मला अजुन आठवतंय की त्यावेळी आम्ही तिथे पाहिलेली अनेक झाडं, अनेक प्रजाती आज त्या भागात सोडा, पण वांगणी पर्यन्त कुठे दिसत नाहीत. 
जसजशी शहर म्हणून वाढ आणि प्रगती होत गेली तसतसा आजुबाजूचा परिसर उजाड़ होत गेला. साधी झाडं लावण्यासाठी माती हवी तर तीही मिळणं कठीण व्हायला लागलं. नंतर तर माती विकत घ्यायची वेळ आली. अर्थात, ज्यांना झाडं लावायची होती त्यांच्यासाठी होतं हे. मुळात ही आवड आणि त्यासाठी काढायचा वेळ हेच गणित जमेना झालं. आणि त्यासाठी लागणारी जागा कुठुन आणायची हा प्रश्न तर होताच.  
लोकांच्या त्रासाला सुरुवात झाली ती पाण्याच्या कमतरतेपासून; पूर्वीही नगरपालिकेचा पाणी पुरवठा कमी पडायचा. पण विहिरी असल्याने आम्हाला त्याची फारशी झळ पोहोचत नव्हती. पण आता, विहिरी कमी झाल्यावर आणि पाणी पिण्यायोग्य न राहिल्याने (दूषित पाणी मिसळल्याने) पाण्याचा तुटवडा जाणवायला लागला होता. विकास होताना जुन्या विहिरी बुजल्या पण नवीन पुरवठा काही पुरेसा नव्हता त्यामुळे पाण्यासाठी पळापळ व्हायला लागली. हे नियोजनाचा अभाव असल्याने झालं.
आजही डोंबिवलीत अनेक (विशेषतः जुन्या इमारती) ठिकाणी पाणी रात्री येतं, काही ठिकाणी फक्त तळमजल्यावर येतं आणि लोकांना पंप लावून ते वर चढवावं लागतं. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी टँकर आणावा लागतो.  तर काही ठिकाणी पाणी एवढं उपलब्ध आहे की दिवसातून दोन वेळेला पाणी पुरवठा होतो. यात पाणी पुरवठ्यामधील असमानता आहे, योग्य नियोजनाची कमतरता आहे, वापरातील निष्काळजीपणा आहे, असे अनेक मुद्दे आहेत. यात आणखी एक गंमत म्हणजे पाणी पुरवठा दोन संस्थांकडून केला जातो, महानगरपालिका आणि MIDC. त्यामुळे, अनेक ठिकाणी लोकांना पाणी परिस्थिती नक्की किती वाईट आहे हेच कळत नाही. अर्थात, आजुबाजूची परिस्थिती, माध्यमं आणि सोशल मिडिया यांच्यामुळे सगळं सगळ्यांना कळत असतंच पण कित्येकदा वळत नाही.
गेल्या १५-२० वर्षांत डोंबिवली हे चौफेर वाढत गेलं. अर्थात, ही वाढ फक्त इमारतींपर्यंत मर्यादित राहिली. जसं शहर वाढत गेलं तशा पायाभूत सुविधा विकसित होणं गरजेचं आणि अपेक्षित होतं, आणि इथे सर्वच आघाड्यांवर भयंकर निराशा अनुभवायला मिळाली. राजकीय, प्रशासकीय, आणि लोकांकडून यावर काहीच अंकुश लावण्याचा फारसा गंभीर आणि दीर्घकाळ चालणारा प्रयत्न झाला नाही.
बहुसंख्य लोक नोकरीनिमित्ताने दिवसभर गावाबाहेर असल्याने आणि घरी येईपर्यंत जीव अर्धा होत असल्याने, शहरात घडणाऱ्या या घडामोडींकडे त्यांचं दुर्लक्ष झालं किंवा केलं गेलं. आणि याला "सोशिक डोंबिवलीकर" असं गोंडस नाव देऊन मूळ मुद्दा  बाजूला ठेवला गेला. यात ना लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय झाले, ना काही चांगल्या चर्चा झाल्या. फक्त तात्पुरते वाद, आणि नंतर एकदम शांतता.
इथे असणाऱ्या सुशिक्षित वर्गालाही (जो मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्वत्र पसरलेला आहे) आपल्या शहराची अवस्था वाईट होत चालली असून ती सुधारण्यासाठी आपण काही प्रयत्न केले पाहिजेत, पुढाकार घेऊन काही उपाय करायला हवेत हे काही नीट  जमलंच नाही.
शहर वाढत गेलं आणि लोक त्याप्रमाणे स्वतःला त्याप्रमाणे adjust करत गेले. अनधिकृत बांधकाम, दंड भरून नियमित केलेलं बांधकाम, सार्वजनिक, सरकारी जमिनीवर केलेली आक्रमणं, वाईट दर्जाचे, खड्ड्यातून शोधायला लागणारे, थोड्या पावसात वाहून जाणारे रस्ते, अतिक्रमण, वाढत्या शहराच्या प्रमाणात न वाढलेली रस्त्यांची रुंदी, वाढलेली वाहनांची संख्या, नियम "मी" सोडून सर्वांनी पाळायचे असतात हा जीवापाड जपलेला समज, वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेला पाण्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न, सर्व experts च्या नजरेतून आणि विचारातून सुटलेला सार्वजनिक वाहनतळांचा प्रश्न, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न, कचरा आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी करायचे उपाय, बेसुमार वृक्षतोडीमुळे झालेले प्रश्न आणि त्यावर न केले गेलेले उपाय, सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि त्यातल्या अडचणी, असे अनंत प्रश्न आज समोर उभे आहेत. पण यातल्या अनेक प्रश्नांबद्दल लोकांमधे, राजकीय वर्तुळात, प्रशासनात काही जाणीव असल्याबद्दलची शंका सुद्धा मनात येत नाही, मग ते सोडवणं ही तर पुढची बाब झाली.
शहरात राहणाऱ्या बहुसंख्य (खरंतर प्रत्येकाने) यात वाटा उचलला आणि प्रत्यक्ष सहभाग घेतला तर अजूनही यातल्या बऱ्याच समस्यांवर योग्य उपाय आहेत आणि ते यशस्वीही होऊ शकतात. यात मुख्य आवश्यकता आहे ती लोकसहभागाची आणि शहर चांगलं ठेवण्याकरता लागणारे प्रयत्न करण्याच्या मानसिकतेची. (क्रमशः)   
महाराष्ट्र टाईम्स, ठाणे प्लस, 11.12.2016

   
  

Monday 26 December 2016

डोंबिवली - एक प्रवास भाग २

डोंबिवली - एक प्रवास भाग २ 
७८-८० सालापासून डोंबिवलीची शहर बनण्याकडे वाटचाल सुरु झाली. तेव्हा ती तशी लगेच लक्षात आली नाही पण आता विचार करताना कळते. तेव्हाचं आमचं विश्व हे तसं मर्यादित असल्याने फार गोष्टी लगेच कळल्या नाहीत. 
अचानक आमच्या लक्षात यायला लागलं की आपल्या खेळण्याच्या जागा कमी व्हायला लागल्या आहेत. जिथे हिरवी शेतं होती, मोकळी मैदानं होती, तिथे मधेच बांधकामाची तयारी किंवा सुरुवात दिसायला लागली. चाळी पडून त्याजागी इमारती उठताना दिसायला लागल्या. पण चाळीतून चांगल्या घरात जायला मिळेल या आनंदात असल्याने आणि अनेक प्रस्तावित सोयींमुळे बाकी दुर्लक्ष झालं असावं बऱ्याच लोकांचं. 
पूर्वी डोंबिवली आणि आजुबाजूची छोटी गावं यात पाणी भरपूर होतं. जुन्या डोंबिवलीकरांना हे नक्की आठवत असेल की पूर्वी खूप विहिरी होत्या, अनेक तळीं होती. पाणथळ जागा अनेक ठिकाणी होत्या.  जसजसं गाव वाढत गेलं, तशा या पाण्याच्या जागा कमी कमी होत गेल्या. माझ्या आठवणीत तर खूप  विहिरी होत्या ज्या माझ्या डोळ्यांसमोर बुजवल्या गेल्या. "विकास" नावाची एक गोंडस कल्पना एवढी प्रभाव टाकून गेली होती की त्याचे परिणाम फार कोणाला कळलेच नाहीत. खरंतर अजूनही अनेकांना ते जाणवत नाहीयेत असंच बोलण्यावरून आणि वागण्यावरून वाटतं.
बाजीप्रभू चौकात पूर्वी मारुती मंदिर होतं, त्याच्या बाजूला एक मोठी विहीर होती. तिथे गणेश विसर्जन होत असे. त्या परिसरात ३ विहिरी होत्या. आता एकही दिसत नाही. पेंड़सेनगर, रामनगर, टिळकनगर, आयरे रोड आणि गाव,  गोग्रासवाडी, पांडुरंगवाडी या सर्व ठिकाणी अनेक मोठ्या विहिरी  होत्या, काही तलाव होते. पण जशी या भागाची वाढ लवकर आणि वेगाने झाली, तशा त्यात इथल्या विहिरी, रामबाणाची बेटं असलेल्या पाणथळ जागा, मैदानं, इत्यादि  गोष्टी हळूहळू लुप्त व्हायला होत गेल्या.
८० सालानंतर औद्योगिक विकास झपाट्याने वाढला आणि त्यामुळे नागरीकरण पण वेगाने  वाढत गेलं. अचानक ४ मजली इमारती दिसायला लागल्या. पावसाळ्यात आपल्याला अचानक भू छत्रं वाढलेली दिसावीत तशा या इमारती बघुन मला वाटायचं. कित्येक इमारतींमधे  तर इतकी कमी जागा होती की वारा किंवा उजेड़ही रस्ता न मिळाल्याने तिथे पोहोचत नसत. आजही अशा अनेक इमारती पहायला मिळतात.
गाव वाढत गेलं तसे बरेच अनोळखी चेहरे दिसायला लागले. हे सण आणि उत्सवाच्या विशेष जाणवायचं. माझ्या आठवणीतला  गणेशोत्सव हल्लीच्या तुलनेत एकदम वेगळा आणि छान असायचा. खूप चांगले कलाकार आपली कला सेवा म्हणून सादर करायला येत. अनेक मोठे कलाकार (गायक, नट, एकपात्री कलाकार), लेखक, कवी, अनेक विचारवंत ऐकायला आणि बघायला मिळत.
दिलीप प्रभावळकर, प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे प्रयोग त्याकाळी सहज बघायला मिळत आणि हे आणि इतर मोठे कलाकार इतके साधे होते की तेही सहज लोकांमधे, मुलांमधे मिसळत असत.
गाण्याचे  आणि व्याख्यानांचे अनेक चांगले कार्यक्रम होत असत. या सर्व कार्यक्रमात लोक मोठ्या संख्येने सहभागी होत असत.  त्याकाळी टीव्हीचं नसलेलं प्रस्थ आणि सोशल मीडिया नसल्याने लोकांना एकमेकांशी बोलायला आणि भेटायला मिळणारा वेळ हे कदाचित त्या मागचं एक महत्त्वाचं कारण असू शकेल.
त्याकाळी गणेशोत्सव म्हणजे अशा चांगल्या कार्यक्रमांची मेजवानी असे. नंतर गणेशोत्सवातले अनेक कार्यक्रम तर १० ऐवजी ५ दिवस किंवा ७ दिवसांवर आले. सगळा भर मिरवणुक किती झगमगाटात आणि आवाजात होते यावर लोकांचं लक्ष केंद्रित व्हायला लागलं.
त्यानंतर दिवाळीचे कार्यक्रम जोरात आणि दिमाखदार व्हायला लागले, नव वर्ष स्वागत यात्रा निघायला लागल्या. पण बाकी कार्यक्रमांचा दर्जा जो खाली गेला तो गेलाच.
उत्सव साजरा करायच्या, मनोरंजनाच्या व्याख्या बदलत गेल्या. जगण्याचा वेग वाढत गेला. आणि खूप वेगात जाताना आपल्याला जवळचं स्पष्ट दिसत नाहीच हा अनुभव येतोच की आपल्याला. तसेच वेगाने सर्व आनंद पटापट उपभोगून टाकण्याच्या घाईमधे खूप मौल्यवान आठवणी आणि गोष्टी आपण गमावतोय हेच बहुदा विसरलं गेलं.
वाढत्या शहरीकरणाचे परिणाम आम्हाला आमच्या शाळेत पण दिसायला लागले. खरंतर आमच्या जोशी हायस्कूलला ५ मैदानं होती. २ लहान आणि ३ मोठी. शाळेच्या २ इमारती होत्या. मैदानं असल्याने आणि खेळण्याची हौस असल्याने शाळेत असताना आंतरशालेय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमधे भाग घेता यायचा. दहावीत असताना अजुन एक इमारत येणार असं नक्की झालं आणि मैदान आक्रसायला लागलं. मुलांचाही मैदानी खेळांकडे असलेला कल जरा कमी व्हायला लागला. आम्ही शाळेत असताना कबड्डी, खोखो, लांब उडी, ऊंच उडी वगैरे खेळ खेळत असूच पण त्या व्यतिरिक्तही क्रिकेट, फुटबॉल (विशेषतः पावसाळ्यात मैदानात चिखल झाला की) भोवरा, गोट्या, उन्हाळ्यात पतंग उडवणे इत्यादि खेळ मुलांमधे प्रिय होते. आम्ही तर गच्चीत क्रिकेट, आटया पाट्या खेळत असू. शाळेमधे असताना बुद्धिबळ हा पण एक चांगला प्रचलित खेळ होता. हौशी लोकांसाठी स्पर्धाही होत. सध्या काय होतं ते माहित नाही. पण एकूणच मुलांचा ओढा मैदानी खेळांकडे जास्त होता, किमान माझ्या पाहण्यात तरी.
शाळा संपली आणि कॉलेज चालू झालं. कॉलेज गावातच होतं, पेंढरकर कॉलेज. त्यावेळी ते गावाबाहेर वाटायचं. शेलारनाका ओलांडला की नंतर दृश्य बदलून जात असे. सध्याचं MIDC चं तरणतलाव, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दुकानं, अर्धवट बांधकाम होऊन आणि पूर्ण होऊन बंद असलेले व्यावसायिक गाळे, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, इत्यादि असलेलं मैदान पाहणाऱ्या लोकांना पूर्वीच्या मैदानाची कल्पना येणं कठीण. पूर्वी तिथे फक्त पेंढरकर कॉलेजची एक इमारत आणि एक शेड वजा, वर पत्रे असलेली, बैठी इमारत आणि  लांब असलेलं टेलीफोन एक्सचेंज, एवढंच होतं. बाकी सर्व मैदान होतं. सध्या ते निम्म्याहून कमी झालंय.
हे मैदान, नेहरू मैदान, भागशाळा मैदान, रेल्वे मैदान आणि DNC शाळेचं मैदान या जागा सर्व वयोगटाच्या मुलांसाठी उपलब्ध असायच्या. मला आठवतय की सुटटीमधे पहाटे ६ वाजता मैदानात जाऊन चांगलं पीच अडवून मग आपापल्या हिमतीप्रमाणे जमेल तेवढा वेळ खेळणे हे उद्योग असे. हिमतीप्रमाणे म्हणण्याचं कारण असं की जास्त उन्हात खेळल्यावर घरी चांगली पूजा होत असे. आणि मोठ्या माणसांना घाबरायची आणि त्यांचं ऐकायची पद्धत बरीच रूढ होती तेव्हा.        
आम्ही राहत होतो तिथे आजूबाजूला मस्त झाडं होती. आंबा, चिंच,  विलायती चिंच, बोर, पेरू, चीकू वगैरे फळझाडं होती. सोनचाफा, पारिजातक, अनंत,  तगर,नाना तऱ्हेच्या जास्वंदी, कोरांटी, आईने आवडीने आणलेली अबोली, बटन शेवंती, इत्यादि फुलझाडं होती. वड, पिंपळ, उंबर, करंज, अशोक, बकुळ, विलायती फणस, फणस, सीताफळ, नारळ, सुपारी, इत्यादि झाडं होती. त्यामुळे खूप आणि खूप प्रकारचे पक्षी बघायला मिळत असत. समोर रामबाणाचं बन होतं. रात्री त्या बनाजवळून जायला भीति वाटायची. त्यात तिथे एक चिंचेचं मोठं झाड़ होतं. काळोखात जाऊन तय झाडाला हात लावून यायची पैज लागायची.
आज हे सगळं आठवलं की हसू येतं, कारण ना ते रामबाण राहिले ना चिंचेचं झाड़. जिथे हे सगळं होतं, तिथे इमारती उभ्या राहिल्या आणि काँक्रिटचं जंगल उभं व्हायला लागलं. हिरवाई कमी होताना  कळत होती पण त्याचा होणारा परिणाम तेवढा लोकांच्या लक्षात येत नव्हता.
जगातलं एक आश्चर्य म्हणता येईल असा MIDC मधे निवासी भाग जोरात वाढायला लागला. लोक पहाटे उठून व्यायामाला तिकडे जायला लागले, अजूनही जातात. मला तर त्या भागात फिरताना हा फेनॉलच्या वास, हा हैड्रोजन सल्फाइडचा, वगैरे ओळखता यायचे. अजूनही येतात.
वस्ती अनिर्बंध वाढल्याचा पहिला परिणाम पाण्याच्या पुरवठ्यावर झाला. आता योग्य नियोजन आणि अंमलबजावणी अभावी हळूहळू फसत चाललेल्या "विकासाचे" परिणाम दिसायला लागले...  (क्रमशः)
(महाराष्ट्र टाइम्स, ठाणे प्लस, ५. १२. २०१६)   


      

Saturday 24 December 2016

डोंबिवली - एक प्रवास 1

डोंबिवली - एक प्रवास भाग १ 
यावर्षी पाऊस मस्त झाला. येताना ज़रा उशिरा आला खरा (लोकांच्या दृष्टीने, पण तसा तो गेली अनेक वर्षं पुढे सरकलाय. पण आपण हवामानखात्याच्या प्रमाणपत्रासाठी थांबू), पण सरासरीपेक्षा जास्त झाला. आणि यावेळी त्याने यायची दिशाही बदलली. तर हा पाऊस बघताना मला माझं लहानपण आठवलं.
जन्मापासून मी डोंबिवलीकर. पहिली दोन वर्षं जरी कर्जतला गेलेली असली तरी जन्म आणि आत्तापर्यंतचा काळ या गावातच गेलेला.  लहानपणाची डोंबिवली ही फारच मस्त होती. एक चांगलं गाव होतं ते, बरचसं गाव आणि शहर याच्यामधे असणारं पण गावाच्या जवळ जाणारं. छोटे छोटे रस्ते, बंगले, कौलारू घरं, दोन किंवा काही ठिकाणी तीन मजली इमारती, रस्त्याच्या बाजूला झाडं, गावात मधे मधे दिसणारी भातशेते, रामबाणाची आणि उंच गवताने भरलेल्या काही पाणथळ जागा, हे सर्रास दिसणारं दृश्य होतं.
माझे आई वडिल नोकरी करत असल्याने आमची (मी आणि बहिण) रवानगी काकांकडे व्हायची. सकाळी थोडावेळ टाइमपास करून नंतर शाळेत दिवस जायचा. काका पेंडसेनगर मधे राहात असल्याने ते शाळेला जवळ होतं. तेव्हाचं पेंड़सेनगर खूपच वेगळे होते. बरीचशी बैठी घरं किंवा बंगले, आणि काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशा दोन किंवा तीन मजली इमारती. बराचसा भाग हा वापरात असलेल्या किंवा पडून राहिलेल्या भातशेतांचा. त्यामुळे खेळायला आणि फिरायला मजा यायची. मनुष्यवस्ती आत्ताच्या तुलनेत तर अगदीच कमी होती. बरीचशी माणसं एकमेकांना ओळखायची.
माझं बरचसं बालपण हे घरापेक्षा घराबाहेरच जास्त गेलंय. पूर्वी, सुदैवाने म्हणायला पाहिजे, टीवी, सिनेमा वगैरे फारसं प्रचलित नव्हतं, किमान आमच्या विश्वात तरी नव्हतं. त्यामुळे, शाळा सोडली तर बाकी काहीच व्याप नसायचा डोक्याला. काही मुलं शिकवणीला जायची (हल्ली ज्याला क्लासेस म्हटलं जातं ते), पण मी आणि आमच्या घरच्या लोकांना याची फार गरज वाटत नसल्याने तेही नव्हतं. त्यामुळे, शाळेव्यतिरिक्त असलेला वेळ हा खेळणं, फिरणं यात मस्त जायचा.
काका त्यावेळी एक बैठ्या चाळीत राहायचे. आजूबाजूला तशीच बैठी घरं आणि जवळच काही दोन मजली इमारती. त्यामागे नजर जाईल तोपर्यंत भातशेती. त्यावेळी बरीचशी लागवडीखाली पण होती. काही आंब्याच्या आणि पेरू, चिकूच्या बागा, जांभूळ आणि बोराची झाडं, चिंचेची काही प्रचंड मोठी झाडं, असा सगळा परिसर होता. बारा बंगला ते बावन चाळ आणि आजूबाजूच्या परिसरात चालत किंवा सायकलने फिरायला जाणं हा अत्यंत आवडीचा उद्योग होता.
घराच्या समोरच एक गोठा होता आणि बाजूच्या गल्लीतही एक गोठा होता. त्यामुळे, तिथे जाऊन म्हशी आणि गाईचं निरिक्षण करणं, दूध काढणं वगैरे गोष्टी बघणं हा वेळ घालवण्याचा एक उद्योग होता. त्या गोठ्याच्या बाजूला एक छोटा तलाव होता.
दोन इमारती सोडून एक मोठी विहीर होती. त्यात परिसरातील बहुतांश मुलंमुली, तरुण, मध्यमवयीन, सगळेच पोहायला जात असत. मीही कधी कधी जात असे पण शेवटपर्यंत पोहायला काही नीट जमलंच नाही. पण ते सर्व वातावरण एकदम छान असायचं.
त्यावेळी बरेचसे खेळ हे घराबाहेर खेळले जात. क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ होता हे खरं, पण आम्ही ऋतुप्रमाणे खेळ खेळत असू. म्हणजे पावसाळा असेल तर भिजत क्रिकेट आणि फुटबॉल खेळायला मजा येत असेच पण आजूबाजूला भरपूर शेतांमुळे छोटी लोखंडी शिग घेऊन रुपवारुपवी हा खेळ खेळला जायचा. पावसाळ्याव्यतिरिक्त ऋतुमधे अनेक मैदानी खेळ खेळले जात असत. त्यात कबड्डी, खोखो, वॉलीबॉल हे खूप कॉमन होते.
मी तर कर्जतहून मामाकडून विटी दांडू करून घेऊन येत असे आणि मग शाळेत आणि नंतर घराच्या अंगणात खेळायला खूप धमाल यायची. त्याव्यतिरिक्त गोट्या हासुध्हा एक लोकप्रिय खेळ होता.
वेगवेगळ्या ऋतूंमधे चिंच, आवळा, आंबे, बोरे, पेरू, जांभळे वगैरे झाडं शोधून त्यावर चढून फळे काढून खायला मजा यायची. मला आठवतय की शाळेत असताना मधल्या सुट्टीत बाजूच्या गल्लीतल्या एक चिंचेच्या प्रचंड झाडावर चढून आम्ही चिंचा काढत असू.
आमची शाळा (स. वा. जोशी विद्यालय) छान होती. दोन छोट्या इमारती आणि चौफेर खेळण्यासाठी मैदान. मैदानी खेळांची आवड आणि अनेक स्पर्धांमधे सहभाग या गोष्टी शाळेमुळे सहज घडून गेल्या. त्याचा खूप चांगला परिणाम झाला एकूण आयुष्यावर, पण तेव्हा कळलंच नाही. तेव्हा फ़क्त मजा वाटायची. त्या सर्व गोष्टी मधून खूप शिकायला मिळत गेलं जे आत्ता जाणवतं.
आजुबाजुला काँक्रीटचं जंगल नव्हतं तर खरी झाडं भरपूर होती. त्यामुळे झाडं ओळखता येत असत. त्याचा फायदा अजूनही होतो. श्रावण महिन्यापासून वेगवेगळे सण सुरु होत. तेव्हा आजच्या तुलनेत धार्मिक भावना वेगळी होती.  आमच्याकडे गणपती कोकणातल्या घरी असायचे पण मला अजुन आठवतय की श्रावण भाद्रपद महिन्यात 'पत्री" गोळा करणं, रोजच्या पूजेसाठी फुलं गोळा करणं, यामुळे आमचं लक्ष चौफेर असे. तगर, डबलतगर, पारिजातक, जास्वंद, गुलाब, मोगरा, हजारी मोगरा, चाफा, सोनटक्का, शेवंती, अनंत, कोरांटी ही आणि अशी अनेक फुलझाडं लक्षात राहिली.
रस्त्याच्या बाजूला आणि अंगणात असलेली बकुळ, आकाशजाई (बुचाची फुलं), कदंब, करंज, सावर, पांगारा, पापडी, नीलगिरी, हाताला आणि डोक्याला लावतात ती मेंदी, कुंपणाला लावलेली कडू मेंदी, सागरगोटा, निवडुंग, अडुळसा, शेवगा, वड, पिंपळ, उंबर, गुलमोहर, पेरू, चिकू, सीताफळ, रामफळ वगैरे झाडं सहज दिसायची.
कवठी चाफा, कैलासपती, शमी अशी काहीशी दुर्मिळ दिसणारी झाडंही दिसत असल्याचं आठवतं.
या सर्व हिरवाई मुळे संपन्न पक्षी आणि कीटक जग बघायला मिळत असे. स्वर्गीय नर्तक, हळदू, तांबट, शिंपी, सुतार, घार, कोतवाल, खाटिक, पोपट, वेडा राघु, खंड्या, भारद्वाज, वगैरे अनेक पक्षी, असंख्य प्रकारचे कीटक आणि फुलपाखरं हे सर्व रोजच्या जीवनाचा भाग होते. लहान असताना मला आठवतय की नवरे कंपाउंड मधे मी मोर नाचताना पाहीलाय
शेतांमुळे साप भरपूर दिसत. पण त्याचा कधीच त्रास झाला नाही. ते आपणहून जात किंवा घरात शिरले तर त्यांना पकडून बाहेर सोडत असू. मारण्याचं प्रमाण तसं कमी होतं.
एकूण जीवनशैली अशी होती की त्यामुळे आपण आजूबाजूच्या पर्यावरणाशी सहज जोडले जायचो. निसर्गाशी चांगला संपर्क आणि संवाद होता. यातून निसर्गचक्र अजाणतेपणी मनात कोरलं गेलं असावं असं आता वाटतं.
हा काळ साधारण 1975 ते 1982 पर्यंतचा. पण त्यानंतर अचानक जसा "विकास" वेगाने व्हायला लागला आणि शहरीकरण जोरात सुरु झालं, तसे त्याचे परिणाम मानवी स्वभाव आणि पर्यावरण, या दोन्हीवर दिसायला लागले आणि गावाचं रूप आणि स्वरुप बदलायला लागलं. (क्रमशः)
(महाराष्ट्र टाइम्स, ठाणे प्लस, २७.११. २०१६) 

    

Sunday 9 October 2016

Myristica swamps - निरंकाराची राई (एक अद्भुत ठिकाण)

निसर्ग संवर्धनासाठी पारंपरिक सामाजिक बंधनाचा यशस्वी मार्ग - निरंकाराची राई (एक अद्भुत ठिकाण)

परवा एका सेमिनारसाठी गोव्याला गेलो होतो २ दिवस. दुपारी ३ वाजता पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काही विशेष काम नव्हतं. त्यामुळे २ सहकाऱ्यांना जवळची देवराई दाखवायला घेऊन गेलो. पणजी पासून साधारण ५० किमी अंतरावर नानोडे नावाचं एक गाव आहे. त्या गावाच्या परिसरात २ देवराया आहेत, त्यातील एक ही "निरंकाराची राई".
देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं जंगल. त्यातील झाडांची तोड़ केली जात नाही. तो भाग जपला जातो. अशा शेकडो देवराया भारतभर आढळतात. देवराया या वैशिष्ट्यपूर्ण संरक्षण, संवर्धन आणि जीवसृष्टीसाठी प्रसिद्ध आहेत.
नानोडे गावच्या देवराईमधे आढळणारी परिस्थिती जगात फारच कमी ठिकाणी बघायला मिळते. याला "Myristica swamps" असं म्हटलं जातं. इथे देव म्हणजे एक ओबडधोबड दगड आहे.
या देवराईचं वैशिष्ट्य म्हणजे इथे जंगली जायफळ आढळतं. ही झाडं एका विशिष्ट वातावरणात आढळतात. पाणी भरपूर असलेल्या आणि ते पकडून ठेवणाऱ्या जमिनीत ही झाडं उगवतात आणि वाढतात. पाणी खूप असल्याने मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे जशी खाजणांत वाढणाऱ्या झाडांची मुळे पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर येतात आणि झाडाला लागणारा ऑक्सिजन पुरावतात तशीच यंत्रणा या जायफळच्या झाडांमधेही बघायला मिळते. फक्त यात एक मोठा आणि विशिष्ट फरक हा असतो की या झाडांची मुळे वर येतात आणि त्या नंतर "U" आकारात परत जमिनीच्या खाली जातात.
या देवराईतून पाण्याचे अनेक झरे निघतात. गावातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी इथेच येतात. हे पाणी वर्षानुवर्षे वाहत आहे. या पाण्यावर पुढे गावात वर्षाला किमान २ पिकं घेतली जातात.
केवळ 0.२ हेक्टर जमिनीवर असलेल्या या देवराई मुळे  पुढच्या अनेक गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होतं.
अशा प्रकारची "Myristica swamps" भारतात फ़क्त ४-५ ठिकाणी नोंदली गेली आहेत आणि गोव्यात तर फक्त एकाच ठिकाणी आहे. दुर्दैवाने, ही एवढी दुर्मिळ गोष्ट फार कोणाला माहित नाही.
दुसऱ्या दिवशी सेमिनारला आलेल्या लोकांपैकी ९०% लोकांना ही गोष्ट माहित नव्हती. आणि यात वेगवेगळ्या सरकारी खात्यातील कनिष्ठ ते वरिष्ठ अधिकारी आणि काही मंत्री होते.
या आणि अशा देवरायांचा उपयोग करून घेऊन लोकसहभागातून उत्तम जलसंधारण करणं सहजशक्य आहे. या दृष्टीने आमचे प्रयत्न चालु असून त्याला चांगलं यश येतंय.
या वैशिष्ट्यपूर्ण देवराईबद्दल आणि जल व्यवस्थापनाच्या दृष्टीने देवराई संस्थेचा उपयोग कसा करता येऊ शकेल याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचून त्याचा योग्य वापर व्हावा म्हणून हा लेखप्रपंच.  

Sunday 14 August 2016

Power of "Spring cordoning"


In the hills, in rainy season, one can see numerous springs. These springs have varied water potential and life. But, most of the springs yield water up to the end of the rainy season,i.e. about 100 days.

Since, these springs are seasonal, widely dispersed, its potential and utility is often underestimated or at times, completely neglected.

If proper watershed structures are made and cordoning of these springs is done, it has a great potential of providing good quality, potable, clean water throughout the rainy season. It has great potential in Konkan and ranges of Sahyadri (Both east & west slopes) in Maharashtra, since the rainfall is more & assured in this region.

In the cordoning process, a mass concrete wall of appropriate dimensions is built on appropriate location (identified by an expert after actual site study). It stores water and creates pressure on the spring, which results in reducing flow rate of the spring and enhancing life of the spring. We have experience of about three months' enhancement in the life of the spring, if properly cordoned.

By making such structures, we can provide clean, potable water in the hamlets, even in hilly areas. There is no requirement of any kind of energy to operate or maintain these structures. Cleaning of the structure once in a year is sufficient. If properly managed, it works for at least 18-20 years.

To explain the actual potential of a spring and enhancement after cordoning, let us take one example.

A spring having flow rate of 30 liters per minute is very common. Now, with this flow rate, for 100 days, the water potential of the spring will be,

30 liters x 60 (minutes) x 24 (hours) x 100 (days) = 43,20,000 liters every year
Sounds interesting??

Now, when we cordon the spring, it helps in enhancing life of the spring for three months. So, the water potential after cordoning will be,

30 x 60 x 24 x 150 = 64,80,000 liters every year

From a tiny spring of 30 liters per minute water flow, we can get this much quantity of clean, potable, free of cost water every year, for years.

In a village near Lonavala, we have cordoned 11 springs at different locations, few of which have potential up to 100 liters per minute. This has helped villagers in getting potable water in the village, almost for 10 months.

And yet, we are not working smartly in watershed development and are looking for larger projects with more capital, operational and maintenance costs.

Site specific, appropriate watershed development structures are necessary for success. The structures and dimensions changes as per topography, geology, rainfall, usage, etc.

Dr Umesh Mundlye
   

Friday 29 April 2016

जलसंधारण करताना .....


जलसंधारण करताना दीर्घकालीन चांगला परिणाम होण्यासाठी आणखी काय करायला हवं?


आज आकाशवाणी अस्मिता वाहिनीकडून फोन आला होता. महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ आणि त्यावर चाललेले उपाय यावर मत काय हा प्रश्न विचारला आणि अजुन काय करणं आवश्यक आहे याबद्दल माझं मत विचारलं. माझं उत्तर खाली देतोय -
नद्यांचं खोलीकरण करणं जोरात चालू आहे. नदीतला गाळ काढणं हे अतिशय योग्य आहे. ते करायलाच हवंय. पण नद्यांचं सरसकट 3 मीटर, 6 मीटर खोलीकरण करणं आणि तेही सलग 5-7 किमी करणं थोडंसं धोक्याचं आहे.नदी ही एक परिसंस्था (ecosystem) आहे. आपण जास्तीत जास्त पाणी अडवण्यासाठी तिथे मोठी टाकी किंवा डोह तयार करतोय का याचा विचार काम करणार्या माणसांनी करायला हवा. आपण फक्त माणसाची गरज बघून पाणी साठवण्याचा विचार करतोय, निसर्गाच्या संतुलनाचा करत नाहीये.आज पाणी साठवून ठेवताना नदीचा नैसर्गिक उतार संपतोय, प्रवाहावर त्याचा परिणाम होणार आहे. नदी वाहती राहिली नाही तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.त्याचबरोबर, आपल्याकडे बहुतेक सर्व गावांमधे सांडपाणी नदीत सोडलं जातं. आता ते सांडपाणी प्रवाहाबरोबर निघून जातं. तिथे खोलीकरण करून पाणी साठवलं तर सर्व साठा प्रदूषित होण्याची भीती आहे. यावर ठोस उपाय होत नाही तोपर्यंत हा धोका कायमच आहे. यामुळे सर्व साठवलेलं पाणी आणि भूगर्भातील पाणी प्रदूषित होईल.दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ज्याकडे बहुसंख्य लोकांनी दुर्लक्ष केलंय, तो म्हणजे, जलसंधारणाचे दीर्घकालीन फायदे हवे असतील तर आजपर्यंत जी बेसुमार वृक्षतोड झालीय त्यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडं लावून ती जगवण्याचे सर्व प्रयत्न करावे लागतील. जर झाडं लावली आणि वाढवली गेली नाहीत तर पुन्हा 2-3 वर्षांत बंधारे गाळाने परत भरून जातील.झाडं लावणं आणि जगवणं ही खूप कठीण गोष्ट येत्या 2-3 वर्षांत परिणामकारकरित्या करावी लागणार आहे. त्यामुळे मातीची धूपही कमी होईल आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल.हे दोन्ही उपाय एकाचवेळी करण्याची गरज आहे. जलसंधारणाची कामं site specific असणं आवश्यक आहे. त्यामुळे सरसकट सर्वत्र एकाच प्रकारचं काम न करता, लोकसंख्या, पाणी साठवण्याची क्षमता, नदीच्या पात्राची रूंदी, खोली, आजुबाजुच्या परिसरातील शेतजमिनी आणि वस्त्यांचं प्रमाण, इत्यादि बाबींचा अभ्यास करून मग कामं केली तर कोणाचंच नुकसान न होता सर्वांचा फायदा होऊ शकतो.शहरांतही प्रत्यक्ष काम खूप कमी लोक करून घेताना दिसतायत. लोकांचा भर पाण्याबद्दलची चर्चा एकमेकांत, माध्यमांत आणि सोशल मिडीयावरच जास्त दिसतेय. 

यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आणि आपल्याकडे पाणी वापरण्याचं आणि वाचवण्याचं नियोजन नसल्यामुळे पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झालीय. यात एक गोष्ट चांगली आहे की गेली 2-3 वर्षं जलसंधारणाचे विविध प्रयत्न वेगगवेगळ्या संस्थांकडून, विविध पातळ्यांवर होतायत.

यावर्षी चालू असलेले प्रयत्न 2 प्रकारे आहेत, tanker किंवा अन्य मार्गाने पाणीपुरवठा करणं आणि विविध नद्यांचं खोलीकरण करणं. 
बाकीही जलसंधारणाची कामं होतायत पण वर सांगितलेली कामं विशेष चालू आहेत. यातल्या पाणी पुरवठ्याच्या प्रयत्नांची गरज नक्कीच आहे. कारण लगेच पाणी देण्याचा दुसरा कोणताही परिणामकारक पर्यायी मार्ग नाहीये.

अजुन एक मुद्दा. नदी त्या भागातल्या सगळ्यात सखल भागातून वाहते. तिचं खोलीकरण करून अजुन 10-20 फूट खोल जाऊन आपण तो भाग अधिक सखल करतोय. त्यामुळे नदीतलं पाणी बाजुला जाईल की आजुबाजुला असलेल्या शेतांतलं पाणी उताराने खोल केलेल्या नदीत येईल? यावर कोणी विचार केलाय का? अशाने आजूबाजूच्या शेतातल्या विहिरी लवकर आटायची भीती निर्माण झाली आहे. 

खोलीकरण करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नुसतं खोलीकरण करून काही फार उपयोग नाही होणार. जर ठराविक अंतरावर योग्य जागा बघून छोटे बंधारे (जास्तीत जास्त ३-४ फूट उंचीचे) बांधले तर पाणी काही काळ थांबेल आणि मग ते आजूबाजूला जमिनीत जिरेल. अर्थात, त्यासाठी जागा बाजुओं खोलीकरण करणं आवश्यक आहे. 

त्याचबरोबर, जे बंधारे बांधलेले आहेत पण पाणीगळती होतेय किंवा गाळाने भरलेले आहेत तिथेही योग्य पद्धतीने दुरूस्ती, बळकटीकरण आणि गाळ काढणं इत्यादि कामं केली पाहिजेत. शक्य तिथे योग्य जागी भूमिगत बंधारे बांधणे, झरे, ओढे, नद्या, तलाव, पाझर तलाव, इत्यादि प्रकारांनी जलसंधारण केलं पाहिजे.

यात लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. लोकसहभागाशिवाय यात दीर्घकालीन यश कठीण आहे.

शहरातल्या लोकांनीही हे लक्षात ठेवायला हवं की सध्या आपल्याला मिळत असलेलं पाणी हे आजुबाजुच्या ग्रामीण परिसरातून मिळतेय आणि अशीच परिस्थिती कायम राहिली तर दिवसेंदिवस शहराला होणारा पाणी पुरवठा कमी होत जाणार आहे. त्यामुळे फक्त या पाण्यावर अवलंबून भागणार नाही. आपल्या परिसरात पडणारं पााणी आपण जमिनीत जिरवून नंतर वापरू शकतो. त्यामुळे महापालिकेवर पिण्याव्यतिरिक्त पाण्यासाठी जास्त अवलंबून रहावं लागणार नाही. फक्त त्यासाठी केवळ चर्चा करून चालणार नाही, योग्य तज्ज्ञ व्यक्तींकडून योग्य ठिकाणी योग्य प्रकारे काम करावं लागेल.
पाण्याच्या स्वयंपूर्णतेकडे जायचं असेल तर हे लवकरात लवकर करावंच लागेल. अन्यथा, येणारा काळ आणखी बिकट असणार आहे. 
फोटो - नदीचं खोलीकरण चालू असताना. 

Tuesday 26 April 2016

जमिनीखाली ४०० फुटांवर पाणी नाही पण २० फुटांवर आहे! हा चमत्कार आहे की नैसर्गिक गोष्ट?

जमिनीखाली ४०० फुटांवर पाणी नाही पण २० फुटांवर आहे! हा चमत्कार आहे की नैसर्गिक गोष्ट?

 ही कथा आहे माझ्या एक मित्राची, हेमंत पारसकरची. ३ वर्षांपूर्वीची. एक रोटरी कार्यक्रमात तो दुसर्या मित्राला सांगत होता, त्याचं बदलापुरजवळ फ़ार्म होतं आणि तिथे पाण्याचा काही प्रश्न होता. एक बोरवेल आहे पण पाणी फक्त १०-१५ मिनिटं येतं आणि मग बंद पडतं. आता दूसरी बोरवेल करायची आहे, त्यासाठी माणूस येणार आहे. तेवढ्यात त्याने मला पाहिलं आणि तो मला म्हणाला की एकदा येऊन सांग ना काही करता येतय का ते?
कामाच्या व्यापात ते राहून गेलं आणि एक दिवस त्याचा परत फोन आला की आज दूसरी बोरवेल करतोय कारण पहिली बोरवेल अजिबात पाणी देत नाहीये. मला वेळ होता म्हणून मी गेलो, तेव्हा बोरवेलचं काम चालु झालं होतं. त्यामुळे त्याबद्दल काही न बोलता मी त्याला सांगितलं की काही अडचण आली तर सांग, मी आत्ता तुझ्या जमिनीचा सर्वे केलाय आणि माझ्याकडे अजुन १-२ मार्ग आहेत पाणी मिळवण्यासाठी.
रात्री त्याचा फोन आला की थोडं थोडं करत ४०० फुटांपर्यन्त खाली गेल्यावरही पाणी बिलकुल मिळालं नाही. शेवटी बोरवेल करणारा वाद घालून निघून गेला. तेव्हा तू काहीही कर पण उद्या ये.
मी दुसर्या दिवशी गेलो. सगळे हताश होते की ४०० फुट खाली जाऊन पाणी नाही मिळालं, आता पुढे काय? लावलेली झाडं मरणार का? पाणीच नाही मिळालं तर पुढे काय करायचं?
मी केलेल्या त्या जमिनीच्या अभ्यासाप्रमाणे मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे बोरवेल न करता विहीर करायला हवी होती. विहीरीला पाणी मिळेल इथे.
त्या सर्वांना हा मोठा धक्का होता. जिथे ४०० फुट खोल पाणी मिळालं नाही तिथे हा सांगतोय की विहीरीला पाणी मिळेल? त्यावर खूप विचार करून त्यांनी माझ्या सल्ल्यावर विश्वास ठेवला आणि मी काढून दिलेल्या ठिकाणी विहीर खणायला सुरुवात केली.

दुसर्या दिवशी दुपारी त्या मित्राचा फोन आला, उमेश, १७ फुटांवर एक झरा मिळालाय आणि २ तासांनी परत फोन आला की १९ फुटांवर अजुन एक झरा लागलाय.
सकाळी मी जागेवर गेलो तेव्हा तिथे अंदाजे ४ फुट पाणी जमा झालं होतं. सगळ्यांच्या दृष्टीने हा चमत्कार होता कारण ४०० फूट खोल पाणी नाही आणि २० फुटांवर आहे हे दिसत असलं तरी पटत नव्हतं.
तेव्हापासून तय विहीरीला आजतागायत पाणी आहे. यावर्षी कमी पाऊस, जास्त तापमान या गोष्टी असूनही त्या विहीरीला आजही पाणी आहे आणि त्या पाण्यामुळे झाडं चांगली वाढली आहेत.
यावरून काय लक्षात ठेवायचं? 
१. जमिनीचा प्रकार, उतार, मातीच्या थराची जाडी, मातीचा प्रकार, भौगोलिक परिस्थिती आदि गोष्टींचा अभ्यास करून योग्य प्रकारे जलसंधारण उपाय केले तर निश्चीत फायदा होतो.
२. पाण्याचा स्त्रोत कसा आहे, कुठे आहे, त्याची ताकद किती आहे हे कोणाला नक्की सांगता येत नाही. त्याचा फ़क्त अंदाज बांधता येतो.
३. हे काम योग्य अधिकारी व्यक्तिकडून करून घेणं चांगलं, त्यामुळे यश मिळण्याचं प्रमाण खूप वाढतं.
४. विहीरीला पाणी मिळालं म्हणजे बोरवेल पण पाणी देईल हा समज चुकीचा आहे.

डॉ. उमेश मुंडल्ये       

Monday 18 April 2016

काशिग जलसंधारण योजना २०१६

काशिग जलसंधारण योजना २०१६ -
 काशिग हे गांव लोणावळा पौड़ रस्त्यावर तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं आहे. एकदम सुंदर आणि निसर्गरम्य परिसर.  चारही बाजूंनी असलेल्या डोंगर रांगा मधे वसलेल्या ७ वाडया , ३ वाडया  सपाटीला तर बाकीच्या २०० ते ४०० फुट उंचीवर. गावाची लोकसंख्या ६००० च्या घरात . गावापासून ३ - ४ किलोमीटर वर एक धरण. सगळं गाव डोंगराच्या उतारावर वसलेलं. सगळा उतार धरणाकडे जाणारा. धरणाच्या पलीकडे एक विहीर. त्यातून गावाला पाणी पुरवठा होतो. पण त्यासाठी लागणारी वीज खूप आहे आणि त्याचा खर्च ग्राम पंचायतीला परवडत नाही. आणि त्यात पम्प बंद पडला किंवा वीज नसेल तर पाणी मिळत नाही. गावातून वाहणारा एक ओढा, त्याला पण फार खोली आणि रुंदी नाही. काही ठिकाणी तर उतार एवढा जास्त आहे की पाणी साठविण्यासाठी काही उपयोग नाही. सपाटीवर या ओढ्याशिवाय कुठेही पाणी अडवायला जागा नाही. माती फार खोल नसल्याने आणि शेती असल्याने तलाव होण्याची शक्यता नाही.   
पण हे असूनही गाव तसं सुदैवी म्हणायला हवं कारण वरच्या डोंगरातून ११ ठिकाणी झरे वाहतात आणि त्याचं पाणी गावाला जानेवारी पर्यन्त मिळतं. हे झरे उंचावर असल्याने पाणी गावापर्यन्त उताराने कोणतीही शक्ती  न वापरता येतं. पण हे पुरेसं होत नाही आणि गावाला  जानेवारी ते जून पाण्याची टंचाई जाणवते.
तसेच हे झरे प्रत्येक वाडीच्या वर साधारण ३०० ते ६०० फूट उंच असल्याने तिथे जाऊन पाणी भरणं कठीण आहे.
रोटरी क्लब ऑफ़ खड़की  यांनी आमच्या पूर्वीच्या एक कामाचे रिपोर्ट वाचून आम्हाला या गावासाठी काही करता येईल का हे पाहण्यासाठी बोलावलं.
आमच्या असं लक्षात आलं की ७ वाडया खूप अंतरावर आहेत आणि प्रत्येक वाड़ीसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आवश्यक आहे. आणि या योजनेसाठी ऊर्जेची गरज लागता कामा नये.
गावासाठी पाणी  व्यवस्थापन करताना पिण्याचे पाणी, दुसर्या पिकासाठी पाणी आणि जनवरांसाठी पाणी असे प्रकार करून त्याप्रमाणे योजना करायचं ठरवलं.
प्रत्येक वाडीला किमान १ आणि कमाल ३ झरे पाणी पुरवू शकतात अशी परिस्थिती होती. या झर्यांच्या उगमाजवळ कुंड बांधून पाणी साठवल आणि पाइप टाकून ते त्या वाडीजवळ आणून दिलं (by gravity) तर त्याचा गावाला खूप फायदा होईल हे समजावून सांगितल्यावर गावकरी आणि रोटरी क्लब या दोघांनाही ते पटलं.  मग तसा रिपोर्ट करून दिला.
रोटरी क्लबला Tata Autocomp Hendrickson या कंपनीने हा प्रकल्प पटल्यावर काही आर्थिक मदत देऊ केली आणि कामाला सुरुवात झाली.
३ महिन्यांमधे ११ झर्यांची कुंड बांधणे आणि आवश्यक तिथे वाड़ी पर्यन्त पाईप टाकणे आणि ३ बंधारे (शेतीसाठी) बांधणे ही कामं पूर्ण केली. ही सगळी ठिकाणं ३०० ते ६०० फुट ऊंच आहेत आणि सर्व सामान माणसांनी डोक्यावर घेऊन अतिशय मेहनतीने त्या त्या ठिकाणी वर चढवलं कारण रस्ता नसल्याने सामान न्यायला दुसरा काही मार्ग नव्हता.
दर वर्षी जे झरे जानेवारीत कोरडे व्हायचे ते या वर्षी काम केल्यावर (ते ही जानेवारी मधे करूनही) एप्रिल मधेही पाणी देत आहेत. आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची ऊर्जा वापरावी लागत नाहीये.
या व्यतिरिक्त डोंगरावर असलेला तलाव गाळ काढून स्वच्छ केल्यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यानंतर तो तलाव पूर्ण क्षमतेने भरेल आणि त्यातून वर्षभर पाणी पुरवठा होऊ शकेल. पूर्ण भरल्यावर त्याची क्षमता अंदाजे दीड कोटी लीटर पाणी साठवण्याची आहे.


तीनही बंधारे शेतीच्या भागात असल्याने मोठ्या संख्येने शेतकर्यांना दुसरं पीक घेता येणे शक्य होणार आहे.  तीनही बंधार्यांची साठवण क्षमता अंदाजे २० लाख लीटर आहे. आणि हे जवळजवळ मार्च पर्यन्त पाणी साठवून ठेवतील.
झरे रोज अंदाजे १५ -२० हजार लीटर पाणी पुरवू शकतात. ११ झरे मिळून रोज अंदाजे दोन लाख लीटर पाणी पुरवू शकतात.
सगळ्या प्रकल्पातून दर वर्षी साधारण ३० कोटी लीटरपेक्षा जास्त पाणी अडेल, जिरेल आणि वापरता येईल. 
एवढं सगळं पाणी हे कोणत्याही ऊर्जेशिवाय गावकर्यांना वापरायला मिळणार आहे ही यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
जर कोणतीही जल संधारण योजना त्या गावाच्या परिसराचा अभ्यास करून, पाण्याच्या उपलब्धतेचा आणि मागणीचा विचार करून, लोकसंख्या आणि क्रयशक्तीचा अभ्यास करून आखली आणि त्याप्रमाणे काम केले आणि त्यात लोक सहभाग घेतला तर निश्चित दीर्घकालीन फायदा होतो. 





    

Tuesday 12 April 2016

लोकसहभागामधून जलसंधारण - इखरीचा पाडा, मोखाडा

लोकसहभागामधून जलसंधारणइखरीचा पाडामोखाडा  
जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ राबवायचं असेल तर त्यात स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक असतो. गावाला लागणारं पाणी त्याच परिसरात अडवणे, जिरवणे आणि साठवणे यातून गावाच्या पाण्याच्या गरजेची पूर्तता होऊ शकते. यात पिण्याचंच नाही तर घरगुती वापराचं, गुरांसाठी, इतर वापरासाठी आणि दुसर्या तिसर्या पिकासाठी पाणी याचा विचार करून उपाययोजना आखणं गरजेच असतं.
मोखाडा तालुका हा 100% आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या आणि बाजूच्या शहापूर तालुक्यामधून शहरांसाठी पाणीपुरवठा होतो. पण स्थानिक लोकांना हे पाणी वापरायला बंदी आहे. तसंच लोकवस्ती विरळ आणि पाड्यांमधे विखुरलेली असल्याने जलसंधारण नीट झालेलं नाही, जे झालंय त्यातील बरचसं उन्हाळ्यात उपयोगी पडत नाही कारण सदोष आणि अपुरं बांधकाम केल्यामुळे पाणी मार्चमधेच संपून जातं.
इखरीचा पाडा हे या तालुक्यातलं शेवटचं गाव. बाजूला 5 पाडे. जवळचा बस थांबा 2 किमी लांब. गावात 1 विहीर आणि गाव आणि 5 पाडे (साधारण 2500 लोकवस्ती) पाण्यासाठी या एकमेव विहीरीवर अवलंबून. विहीर मार्चमधे आटायची. पुढचे 3 महिने टँकरवर अवलंबून, तोही आठवड्यातून 2-3 वेळा. विहीर 22 फूट व्यासाची. पाणी 60 फूट खोल, विहीरीच्या मध्यभागी. गावकर्यांनी विजेचे 2 पोल टाकले होते विहीरीवर आणि बिचार्या बाया आणि मुली, बरेचदा पुरूषही, त्या पोलवरून विहीरीवर चालत जाऊन पाणी काढायचे. हे दरवर्षी 3 महिने. लोकांचा सर्वांवरचा विश्वास उडाला होता. गावात पाणी कमी म्हणून स्थलांतराचं प्रमाण खूप. शिक्षण नसल्यामुळे फक्त मजुरीवर जगायला लागायचं. शेती फक्त पावसाळी, भाताची.


 
                            














     Well before work June 2009      
     

  Water fetching from well before work

आरोहन नावाच्या संस्थेने तिथे काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी बोलावलं पाण्याचं काही करता येईल का याचा अभ्यास करायला.
गावातील विहीर ही बेसिनमधे होती. वरच्या आणि खालच्या बाजूला भात खाचरं आणि बाजूने वाहणारा पावसाळी ओहोळ. 
योजना अशी हवी होती की
1.किफायतशीर, 
2. देखभालखर्च अजिबात नको किंवा अगदी कमी,
3. योजनेसाठी वीज किंवा इतर उर्जेची गरज पडायला नको, 
4. कामामुळे कोणाचीही जमीन पाण्याखाली जायला नको
5. पिण्यासाठी, वापरासाठी आणि 2-3 पिकांसाठी पाणी उपलब्ध व्हायला हवं
6. विहीरीचं पाणी संपायला नको

तिथे आम्ही रोटरी क्लबच्या आर्थिक मदतीतून आणि आमच्या योजनेनुसार विहीरीच्या खालच्या बाजूला 1 भूमिगत बंधारा बांधला (खर्च रू. 110000/-), देखभालखर्च- काही नाही, कोणतीही उर्जा लागत नाही,
भूमिगत असल्यामुळे कोणाचीही जमीन घ्यावी लागली नाही.

कामाचा परिणाम - 
  1. त्या वर्षापासून आजतागायत त्या विहीरीचं पाणी आटलं नाही. पाचही पाडे त्या विहीरीवर पाणी भरायचे. गेल्या 2 वर्षांत त्यातल्या 3 पाड्यांमधेही कामं झाली आणि तिथला पाणी प्रश्न पूर्णपणे सुटला.
  2. गोष्ट इथेच नाही संपत. पाणी पुरेसं राहतंय म्हटल्यावर लोकांनी तलाव केला, त्यात पाणी साठवलं आणि मासे सोडून त्याचा व्यवसाय चालू केला
  3. गावातले रस्ते स्वकष्टाने कॉंक्रीटचे केले
  4. माती होती, पाणी मिळालं, विटा पाडल्या आणि घरं पक्की करून घेतली.
  5. काही लोकांनी भाजीपाला लागवड चालू केली.
  6. यामुळे स्थलांतर खूप कमी झालं, आरोग्य सुधारलं, लोकांमधे आत्मविश्वास आला.
  7. या भागातल्या काही शेतकर्यांनी एकत्र येऊन भाजीपाला लागवड केली. त्यातून भेंडी, मिरची निर्यात केली
  8. सध्या काही जण मोगरा लागवड करतायत.
हे सगळं कशामुळे झालं? तर लोकसहभागातून आवश्यक ते उपाय योजल्यामुळे. 
यावरून हे लक्षात येईल की योग्य ठिकाणी योग्य प्रकारे काम केलं तर यश नक्की मिळतं. लोकांना प्राथमिक सुविधा नीट मिळाल्या तर पुढचे बरेच प्रश्न मिटतात आणि परिसराचा शाश्वत विकास होतो.



Well in March after watershed development


Pond for fishing






             






                                                   


Friday 8 April 2016

बोरवेल पुनर्भरण - समज गैरसमज

बोरवेल पुनर्भरण - समज गैरसमज
मागच्या आठवड्यात मंडणगडला गेलो होतो. माझी सवय आहे की सकाळी आपण राहतो त्या परिसरात एक चक्कर मारायची तिथली झाडं, पाणी, पक्षी वगैरे पहायचं. तिथे ज्या हॉटेलमधे राहिलो होतो तिथे एक बोरवेल होती. त्या बोरवेलच्या सभोवताली एक चौकोनी खड्डा केला होता (5×5 फुटांचा, 10 फूट खोल) आणि त्यात खडी आणि रेती टाकून तो खड्डा जवळजवळ भरला होता. त्या खड्ड्यात घराच्या छपराचं पाणी सोडलं होतं.

मालकिणबाई बागेत काम करत होत्या. मी त्यांच्याशी गप्पा मारायला गेलो कारण मातीत हात घालून आनंदाने काम करणारी माणसं मला आवडतात. त्यांना मी या प्रकाराबद्दल विचारलं. त्या म्हणाल्या की बोरवेलचं पुनर्भरण केलंय. पावसाचं पाणी इथे खड्ड्यात सोडलंय ते जमिनीत मुरेल आणि आमच्या बोरवेलला त्याचा फायदा होईल.
मी चकित झालो. पाणी व्यवस्थापन क्षेत्रात काम करत असल्याने मला या योजनेचं विशेष आश्चर्य वाटलं. असा उपाय करून बोरवेलमधे पाणी जाणार का नक्की आणि  किती पाणी जाणार असे प्रश्न विचारल्यावर त्या गोंधळल्या. मग मी त्यांना माझ्या प्रश्नामागचं कारण सांगितलं.
असं का करू नये -
बोरवेल करताना जोपर्यंत माती, मुरूम असतो, तोपर्यंत केसिंग पाईप टाकतात, ज्यायोगे बोरवेल ढासळत नाही. खाली पक्का दगड (काळा कातळ) लागला की मग तो ड्रील करून त्याच्याखालचा पाण्याचा साठा शोधला जातो.
आता, जेव्हा पाऊस पडतो आणि पाणी नैसर्गिकपणे किंवा योजनेमार्फत जमिनीत मुरवलं जातं, तेव्हा ते मातीतून खाली जात जात शेवटी खालच्या कातळापर्यंत पोहोचतंं. पण त्याखाली जायला त्याला जागा नसते. कातळात क्वचित असणार्या हेअरलाईन फटींमधून त्यातलं 12 ते 15% पाणी खालच्या स्तरात जातं, तेही अनेक वर्षांमधे.
कातळाच्या वरच्या भागात जेव्हा पाणी मुरवलं जातं तेव्हा बोरवेलच्या केसिंग पाईपमुळे ते पाणी बोरवेलमधे जाऊ शकत नाही. तो खड्डा पावसात भरतो आणि ते पाणी वाहून जातं उताराच्या दिशेने. त्यामुळे बाजुला खड्डा करून पाणी मुरवणं हे फायद्याचं नक्की नाही. 
योग्य उपाय योजना -
विहीर असेल तर हे फायद्याचं ठरू शकतं कारण विहीरीचे झरे हे कातळाच्या वर असल्याने मुरवलेलं पाणी विहीरीतून परत काढता येऊ शकतं.
बोरवेल पुनर्भरण करताना मात्र पाणी एका चेंबरमधे घेऊन ते फिल्टर करून मग थेट बोरवेलच्या केसिंग पाईपला जोडलं तरच तुम्ही सोडलेलं सर्व पाणी तुमच्या बोरवेलच्या साठ्यात जातं. यात आपण जवळजवळ 90% पर्यंत पडणारं पाणी बोरवेलच्या साठ्यात सोडू शकतो.


फायदे -

1. बोरवेल कोरडी होत नाही
2. पाण्यातले क्षार कमी होतात
3. बोरवेलचं आयुष्य वाढतं
4. परिसरात पाणी तुंबत नाही

फक्त ही योजना अमलात आणताना प्रत्यक्ष त्या कामाचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा अन्यथा नुकसान होऊ शकतं.