Tuesday 27 December 2016

डोंबिवली - एक प्रवास भाग 3

डोंबिवली - एक प्रवास भाग ३ 
भलत्याच वेगाने होणारं शहरीकरण अनेक समस्या आणि अडचणी घेऊन आलं. मुंबईपासून जवळ असलेलं एक गाव असल्याने, मुंबईमधले जागांचे भाव वाढायला लागल्यावर तिथे राहणारी बरीच मध्यमवर्गीय नोकरदार माणसं पूर्वीपासूनच इकडे राहायला आली होती. आता डोंबिवली शहर हे मुंबई आणि उपनगरातील बऱ्याच महाविद्यालयांना आणि शाळांना शिक्षक, सरकारी आणि खाजगी आस्थापनांसाठी अधिकारी आणि कारकून, उद्योगांसाठी लागणारं मनुष्यबळ (विशेषतः ज्याला "white collared" म्हटलं जातं ते) पुरवत होतं. शहरातील बहुसंख्य कमावती माणसं ही दिवसभर कामाला ठाण्या मुंबईला असायची. त्यामुळे डोंबिवली हे शहर नोकरदारांचं शहर म्हणून प्रसिद्ध झालं होतं. तसंच ते अलिप्त लोकांचं शहर किंवा निर्विकार लोकांचं शहर झालं होतं. काहीही झालं तरी आपलं "सोशिक डोंबिवलीकर" नावाचं लादलेलं बिरुद सांभाळण्यात स्वतःची कर्तव्यं आणि अधिकार विसरलेले लोक. 
याचा एक परिणाम असा झाला की गावात घडणाऱ्या गोष्टी या झाल्यानंतर किंवा खूप उशिरा कळायला लागल्या. गावातील सुधारणा, होणारी वाढ, होत असलेला विकास, हे सर्व नोकरदार डोंबिवलीकरांना अनेकदा उशिरा कळत गेलं. त्यातच शाळेत असताना आपण शिकत असलेलं नागरिक शास्त्र, आपण फक्त २० मार्क असलेला विषय, इतक्याच आवडीने शिकलो असल्याने ते प्रत्यक्ष आचरणात आणायचा तसा काही फारसा डोळस प्रयत्न नागरिकांकडून होताना दिसला नाही, अगदी आजही दिसत नाही. त्याला "वेळ नाही" हे कारण दिलं जातं. 
शहराची वाढ होताना, विशेषतः शहर म्हणून वाढ होताना मूलभूत पायाभूत सुविधा चांगल्या असायला हव्यात आणि त्या नीट पुरवायच्या असतील तर आधी शहराचं नियोजन वगैरे गोष्टी करायच्या असतात आणि त्या फक्त कागदावर करून काहीच घडत नाही तर त्यानुसार सरकारी यंत्रणांनी आणि नागरिकांनी वागायचं पण असतं हे बहुदा नागरिकशास्त्र अभ्यासात option ला टाकल्यामुळे बहुसंख्य लोकांना बहुदा कळलंच नसावं. 
नवीन बांधकाम होताना जुनी झाडं तोडली गेली, जुन्या विहिरी, तलाव, शेतं वगैरे नाहीसं होत गेलं आणि तयार झालं ते काँक्रिटचं एक अनियंत्रित, अस्ताव्यस्त वाढत चाललेलं जंगल. खरंतर याला cancerous growth हा जास्त योग्य शब्द म्हणता येईल.  
त्यामुळे आता संध्याकाळी मुख्य रस्त्यांवर  मोर्चा निघाल्यासारखी किंवा मिरवणुका निघाल्यासारखी वाहनांची रांग, त्यात फुटपाथ फेरीवाल्यांनी अडवल्यामुळे रस्त्यांवर चालण्याचा हक्क बजावणारे पादचारी, फेरीवाल्यांना आणि राजकीय नेत्यांना नावं ठेवून नंतर त्याच फेरीवाल्यांकडून (जवळ पडतं, वेळ वाचतो म्हणून) खरेदी करणारे सुशिक्षित नागरिक अशा सर्व शिस्तप्रिय नागरिकांचा एक अप्रतिम कोलाज तयार होताना दिसतो. हे दृश्य सुट्टीच्या दिवशी आणि जिथे सण आणि उत्सव सार्वजानिकरित्या साजरे होतात तिथे तर आणखी रंगतदार तर होतंच। पण उत्सवात त्याला एक जोरदार आवाजही येतो जो सर्वांच्या कानाच्या पडद्यांची परीक्षा पण घेतो. हे सर्व सहन करणं आणि त्यात आनंद शोधणं हे पण नागरिकांचं एक कर्तव्य असतं.   
आम्ही कॉलेजमधे असताना कॉलेजच्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं दिसायची. आज खूपच दुर्मिळ वाटणारी तुतीची झाडं MIDC मधे सहज दिसायची. मी वनस्पतिशास्त्रात पदवी घेत होतो. मला अजुन आठवतंय की त्यावेळी आम्ही तिथे पाहिलेली अनेक झाडं, अनेक प्रजाती आज त्या भागात सोडा, पण वांगणी पर्यन्त कुठे दिसत नाहीत. 
जसजशी शहर म्हणून वाढ आणि प्रगती होत गेली तसतसा आजुबाजूचा परिसर उजाड़ होत गेला. साधी झाडं लावण्यासाठी माती हवी तर तीही मिळणं कठीण व्हायला लागलं. नंतर तर माती विकत घ्यायची वेळ आली. अर्थात, ज्यांना झाडं लावायची होती त्यांच्यासाठी होतं हे. मुळात ही आवड आणि त्यासाठी काढायचा वेळ हेच गणित जमेना झालं. आणि त्यासाठी लागणारी जागा कुठुन आणायची हा प्रश्न तर होताच.  
लोकांच्या त्रासाला सुरुवात झाली ती पाण्याच्या कमतरतेपासून; पूर्वीही नगरपालिकेचा पाणी पुरवठा कमी पडायचा. पण विहिरी असल्याने आम्हाला त्याची फारशी झळ पोहोचत नव्हती. पण आता, विहिरी कमी झाल्यावर आणि पाणी पिण्यायोग्य न राहिल्याने (दूषित पाणी मिसळल्याने) पाण्याचा तुटवडा जाणवायला लागला होता. विकास होताना जुन्या विहिरी बुजल्या पण नवीन पुरवठा काही पुरेसा नव्हता त्यामुळे पाण्यासाठी पळापळ व्हायला लागली. हे नियोजनाचा अभाव असल्याने झालं.
आजही डोंबिवलीत अनेक (विशेषतः जुन्या इमारती) ठिकाणी पाणी रात्री येतं, काही ठिकाणी फक्त तळमजल्यावर येतं आणि लोकांना पंप लावून ते वर चढवावं लागतं. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी टँकर आणावा लागतो.  तर काही ठिकाणी पाणी एवढं उपलब्ध आहे की दिवसातून दोन वेळेला पाणी पुरवठा होतो. यात पाणी पुरवठ्यामधील असमानता आहे, योग्य नियोजनाची कमतरता आहे, वापरातील निष्काळजीपणा आहे, असे अनेक मुद्दे आहेत. यात आणखी एक गंमत म्हणजे पाणी पुरवठा दोन संस्थांकडून केला जातो, महानगरपालिका आणि MIDC. त्यामुळे, अनेक ठिकाणी लोकांना पाणी परिस्थिती नक्की किती वाईट आहे हेच कळत नाही. अर्थात, आजुबाजूची परिस्थिती, माध्यमं आणि सोशल मिडिया यांच्यामुळे सगळं सगळ्यांना कळत असतंच पण कित्येकदा वळत नाही.
गेल्या १५-२० वर्षांत डोंबिवली हे चौफेर वाढत गेलं. अर्थात, ही वाढ फक्त इमारतींपर्यंत मर्यादित राहिली. जसं शहर वाढत गेलं तशा पायाभूत सुविधा विकसित होणं गरजेचं आणि अपेक्षित होतं, आणि इथे सर्वच आघाड्यांवर भयंकर निराशा अनुभवायला मिळाली. राजकीय, प्रशासकीय, आणि लोकांकडून यावर काहीच अंकुश लावण्याचा फारसा गंभीर आणि दीर्घकाळ चालणारा प्रयत्न झाला नाही.
बहुसंख्य लोक नोकरीनिमित्ताने दिवसभर गावाबाहेर असल्याने आणि घरी येईपर्यंत जीव अर्धा होत असल्याने, शहरात घडणाऱ्या या घडामोडींकडे त्यांचं दुर्लक्ष झालं किंवा केलं गेलं. आणि याला "सोशिक डोंबिवलीकर" असं गोंडस नाव देऊन मूळ मुद्दा  बाजूला ठेवला गेला. यात ना लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय झाले, ना काही चांगल्या चर्चा झाल्या. फक्त तात्पुरते वाद, आणि नंतर एकदम शांतता.
इथे असणाऱ्या सुशिक्षित वर्गालाही (जो मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्वत्र पसरलेला आहे) आपल्या शहराची अवस्था वाईट होत चालली असून ती सुधारण्यासाठी आपण काही प्रयत्न केले पाहिजेत, पुढाकार घेऊन काही उपाय करायला हवेत हे काही नीट  जमलंच नाही.
शहर वाढत गेलं आणि लोक त्याप्रमाणे स्वतःला त्याप्रमाणे adjust करत गेले. अनधिकृत बांधकाम, दंड भरून नियमित केलेलं बांधकाम, सार्वजनिक, सरकारी जमिनीवर केलेली आक्रमणं, वाईट दर्जाचे, खड्ड्यातून शोधायला लागणारे, थोड्या पावसात वाहून जाणारे रस्ते, अतिक्रमण, वाढत्या शहराच्या प्रमाणात न वाढलेली रस्त्यांची रुंदी, वाढलेली वाहनांची संख्या, नियम "मी" सोडून सर्वांनी पाळायचे असतात हा जीवापाड जपलेला समज, वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेला पाण्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न, सर्व experts च्या नजरेतून आणि विचारातून सुटलेला सार्वजनिक वाहनतळांचा प्रश्न, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न, कचरा आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी करायचे उपाय, बेसुमार वृक्षतोडीमुळे झालेले प्रश्न आणि त्यावर न केले गेलेले उपाय, सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि त्यातल्या अडचणी, असे अनंत प्रश्न आज समोर उभे आहेत. पण यातल्या अनेक प्रश्नांबद्दल लोकांमधे, राजकीय वर्तुळात, प्रशासनात काही जाणीव असल्याबद्दलची शंका सुद्धा मनात येत नाही, मग ते सोडवणं ही तर पुढची बाब झाली.
शहरात राहणाऱ्या बहुसंख्य (खरंतर प्रत्येकाने) यात वाटा उचलला आणि प्रत्यक्ष सहभाग घेतला तर अजूनही यातल्या बऱ्याच समस्यांवर योग्य उपाय आहेत आणि ते यशस्वीही होऊ शकतात. यात मुख्य आवश्यकता आहे ती लोकसहभागाची आणि शहर चांगलं ठेवण्याकरता लागणारे प्रयत्न करण्याच्या मानसिकतेची. (क्रमशः)   
महाराष्ट्र टाईम्स, ठाणे प्लस, 11.12.2016

   
  

Monday 26 December 2016

डोंबिवली - एक प्रवास भाग २

डोंबिवली - एक प्रवास भाग २ 
७८-८० सालापासून डोंबिवलीची शहर बनण्याकडे वाटचाल सुरु झाली. तेव्हा ती तशी लगेच लक्षात आली नाही पण आता विचार करताना कळते. तेव्हाचं आमचं विश्व हे तसं मर्यादित असल्याने फार गोष्टी लगेच कळल्या नाहीत. 
अचानक आमच्या लक्षात यायला लागलं की आपल्या खेळण्याच्या जागा कमी व्हायला लागल्या आहेत. जिथे हिरवी शेतं होती, मोकळी मैदानं होती, तिथे मधेच बांधकामाची तयारी किंवा सुरुवात दिसायला लागली. चाळी पडून त्याजागी इमारती उठताना दिसायला लागल्या. पण चाळीतून चांगल्या घरात जायला मिळेल या आनंदात असल्याने आणि अनेक प्रस्तावित सोयींमुळे बाकी दुर्लक्ष झालं असावं बऱ्याच लोकांचं. 
पूर्वी डोंबिवली आणि आजुबाजूची छोटी गावं यात पाणी भरपूर होतं. जुन्या डोंबिवलीकरांना हे नक्की आठवत असेल की पूर्वी खूप विहिरी होत्या, अनेक तळीं होती. पाणथळ जागा अनेक ठिकाणी होत्या.  जसजसं गाव वाढत गेलं, तशा या पाण्याच्या जागा कमी कमी होत गेल्या. माझ्या आठवणीत तर खूप  विहिरी होत्या ज्या माझ्या डोळ्यांसमोर बुजवल्या गेल्या. "विकास" नावाची एक गोंडस कल्पना एवढी प्रभाव टाकून गेली होती की त्याचे परिणाम फार कोणाला कळलेच नाहीत. खरंतर अजूनही अनेकांना ते जाणवत नाहीयेत असंच बोलण्यावरून आणि वागण्यावरून वाटतं.
बाजीप्रभू चौकात पूर्वी मारुती मंदिर होतं, त्याच्या बाजूला एक मोठी विहीर होती. तिथे गणेश विसर्जन होत असे. त्या परिसरात ३ विहिरी होत्या. आता एकही दिसत नाही. पेंड़सेनगर, रामनगर, टिळकनगर, आयरे रोड आणि गाव,  गोग्रासवाडी, पांडुरंगवाडी या सर्व ठिकाणी अनेक मोठ्या विहिरी  होत्या, काही तलाव होते. पण जशी या भागाची वाढ लवकर आणि वेगाने झाली, तशा त्यात इथल्या विहिरी, रामबाणाची बेटं असलेल्या पाणथळ जागा, मैदानं, इत्यादि  गोष्टी हळूहळू लुप्त व्हायला होत गेल्या.
८० सालानंतर औद्योगिक विकास झपाट्याने वाढला आणि त्यामुळे नागरीकरण पण वेगाने  वाढत गेलं. अचानक ४ मजली इमारती दिसायला लागल्या. पावसाळ्यात आपल्याला अचानक भू छत्रं वाढलेली दिसावीत तशा या इमारती बघुन मला वाटायचं. कित्येक इमारतींमधे  तर इतकी कमी जागा होती की वारा किंवा उजेड़ही रस्ता न मिळाल्याने तिथे पोहोचत नसत. आजही अशा अनेक इमारती पहायला मिळतात.
गाव वाढत गेलं तसे बरेच अनोळखी चेहरे दिसायला लागले. हे सण आणि उत्सवाच्या विशेष जाणवायचं. माझ्या आठवणीतला  गणेशोत्सव हल्लीच्या तुलनेत एकदम वेगळा आणि छान असायचा. खूप चांगले कलाकार आपली कला सेवा म्हणून सादर करायला येत. अनेक मोठे कलाकार (गायक, नट, एकपात्री कलाकार), लेखक, कवी, अनेक विचारवंत ऐकायला आणि बघायला मिळत.
दिलीप प्रभावळकर, प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे प्रयोग त्याकाळी सहज बघायला मिळत आणि हे आणि इतर मोठे कलाकार इतके साधे होते की तेही सहज लोकांमधे, मुलांमधे मिसळत असत.
गाण्याचे  आणि व्याख्यानांचे अनेक चांगले कार्यक्रम होत असत. या सर्व कार्यक्रमात लोक मोठ्या संख्येने सहभागी होत असत.  त्याकाळी टीव्हीचं नसलेलं प्रस्थ आणि सोशल मीडिया नसल्याने लोकांना एकमेकांशी बोलायला आणि भेटायला मिळणारा वेळ हे कदाचित त्या मागचं एक महत्त्वाचं कारण असू शकेल.
त्याकाळी गणेशोत्सव म्हणजे अशा चांगल्या कार्यक्रमांची मेजवानी असे. नंतर गणेशोत्सवातले अनेक कार्यक्रम तर १० ऐवजी ५ दिवस किंवा ७ दिवसांवर आले. सगळा भर मिरवणुक किती झगमगाटात आणि आवाजात होते यावर लोकांचं लक्ष केंद्रित व्हायला लागलं.
त्यानंतर दिवाळीचे कार्यक्रम जोरात आणि दिमाखदार व्हायला लागले, नव वर्ष स्वागत यात्रा निघायला लागल्या. पण बाकी कार्यक्रमांचा दर्जा जो खाली गेला तो गेलाच.
उत्सव साजरा करायच्या, मनोरंजनाच्या व्याख्या बदलत गेल्या. जगण्याचा वेग वाढत गेला. आणि खूप वेगात जाताना आपल्याला जवळचं स्पष्ट दिसत नाहीच हा अनुभव येतोच की आपल्याला. तसेच वेगाने सर्व आनंद पटापट उपभोगून टाकण्याच्या घाईमधे खूप मौल्यवान आठवणी आणि गोष्टी आपण गमावतोय हेच बहुदा विसरलं गेलं.
वाढत्या शहरीकरणाचे परिणाम आम्हाला आमच्या शाळेत पण दिसायला लागले. खरंतर आमच्या जोशी हायस्कूलला ५ मैदानं होती. २ लहान आणि ३ मोठी. शाळेच्या २ इमारती होत्या. मैदानं असल्याने आणि खेळण्याची हौस असल्याने शाळेत असताना आंतरशालेय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमधे भाग घेता यायचा. दहावीत असताना अजुन एक इमारत येणार असं नक्की झालं आणि मैदान आक्रसायला लागलं. मुलांचाही मैदानी खेळांकडे असलेला कल जरा कमी व्हायला लागला. आम्ही शाळेत असताना कबड्डी, खोखो, लांब उडी, ऊंच उडी वगैरे खेळ खेळत असूच पण त्या व्यतिरिक्तही क्रिकेट, फुटबॉल (विशेषतः पावसाळ्यात मैदानात चिखल झाला की) भोवरा, गोट्या, उन्हाळ्यात पतंग उडवणे इत्यादि खेळ मुलांमधे प्रिय होते. आम्ही तर गच्चीत क्रिकेट, आटया पाट्या खेळत असू. शाळेमधे असताना बुद्धिबळ हा पण एक चांगला प्रचलित खेळ होता. हौशी लोकांसाठी स्पर्धाही होत. सध्या काय होतं ते माहित नाही. पण एकूणच मुलांचा ओढा मैदानी खेळांकडे जास्त होता, किमान माझ्या पाहण्यात तरी.
शाळा संपली आणि कॉलेज चालू झालं. कॉलेज गावातच होतं, पेंढरकर कॉलेज. त्यावेळी ते गावाबाहेर वाटायचं. शेलारनाका ओलांडला की नंतर दृश्य बदलून जात असे. सध्याचं MIDC चं तरणतलाव, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दुकानं, अर्धवट बांधकाम होऊन आणि पूर्ण होऊन बंद असलेले व्यावसायिक गाळे, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, इत्यादि असलेलं मैदान पाहणाऱ्या लोकांना पूर्वीच्या मैदानाची कल्पना येणं कठीण. पूर्वी तिथे फक्त पेंढरकर कॉलेजची एक इमारत आणि एक शेड वजा, वर पत्रे असलेली, बैठी इमारत आणि  लांब असलेलं टेलीफोन एक्सचेंज, एवढंच होतं. बाकी सर्व मैदान होतं. सध्या ते निम्म्याहून कमी झालंय.
हे मैदान, नेहरू मैदान, भागशाळा मैदान, रेल्वे मैदान आणि DNC शाळेचं मैदान या जागा सर्व वयोगटाच्या मुलांसाठी उपलब्ध असायच्या. मला आठवतय की सुटटीमधे पहाटे ६ वाजता मैदानात जाऊन चांगलं पीच अडवून मग आपापल्या हिमतीप्रमाणे जमेल तेवढा वेळ खेळणे हे उद्योग असे. हिमतीप्रमाणे म्हणण्याचं कारण असं की जास्त उन्हात खेळल्यावर घरी चांगली पूजा होत असे. आणि मोठ्या माणसांना घाबरायची आणि त्यांचं ऐकायची पद्धत बरीच रूढ होती तेव्हा.        
आम्ही राहत होतो तिथे आजूबाजूला मस्त झाडं होती. आंबा, चिंच,  विलायती चिंच, बोर, पेरू, चीकू वगैरे फळझाडं होती. सोनचाफा, पारिजातक, अनंत,  तगर,नाना तऱ्हेच्या जास्वंदी, कोरांटी, आईने आवडीने आणलेली अबोली, बटन शेवंती, इत्यादि फुलझाडं होती. वड, पिंपळ, उंबर, करंज, अशोक, बकुळ, विलायती फणस, फणस, सीताफळ, नारळ, सुपारी, इत्यादि झाडं होती. त्यामुळे खूप आणि खूप प्रकारचे पक्षी बघायला मिळत असत. समोर रामबाणाचं बन होतं. रात्री त्या बनाजवळून जायला भीति वाटायची. त्यात तिथे एक चिंचेचं मोठं झाड़ होतं. काळोखात जाऊन तय झाडाला हात लावून यायची पैज लागायची.
आज हे सगळं आठवलं की हसू येतं, कारण ना ते रामबाण राहिले ना चिंचेचं झाड़. जिथे हे सगळं होतं, तिथे इमारती उभ्या राहिल्या आणि काँक्रिटचं जंगल उभं व्हायला लागलं. हिरवाई कमी होताना  कळत होती पण त्याचा होणारा परिणाम तेवढा लोकांच्या लक्षात येत नव्हता.
जगातलं एक आश्चर्य म्हणता येईल असा MIDC मधे निवासी भाग जोरात वाढायला लागला. लोक पहाटे उठून व्यायामाला तिकडे जायला लागले, अजूनही जातात. मला तर त्या भागात फिरताना हा फेनॉलच्या वास, हा हैड्रोजन सल्फाइडचा, वगैरे ओळखता यायचे. अजूनही येतात.
वस्ती अनिर्बंध वाढल्याचा पहिला परिणाम पाण्याच्या पुरवठ्यावर झाला. आता योग्य नियोजन आणि अंमलबजावणी अभावी हळूहळू फसत चाललेल्या "विकासाचे" परिणाम दिसायला लागले...  (क्रमशः)
(महाराष्ट्र टाइम्स, ठाणे प्लस, ५. १२. २०१६)   


      

Saturday 24 December 2016

डोंबिवली - एक प्रवास 1

डोंबिवली - एक प्रवास भाग १ 
यावर्षी पाऊस मस्त झाला. येताना ज़रा उशिरा आला खरा (लोकांच्या दृष्टीने, पण तसा तो गेली अनेक वर्षं पुढे सरकलाय. पण आपण हवामानखात्याच्या प्रमाणपत्रासाठी थांबू), पण सरासरीपेक्षा जास्त झाला. आणि यावेळी त्याने यायची दिशाही बदलली. तर हा पाऊस बघताना मला माझं लहानपण आठवलं.
जन्मापासून मी डोंबिवलीकर. पहिली दोन वर्षं जरी कर्जतला गेलेली असली तरी जन्म आणि आत्तापर्यंतचा काळ या गावातच गेलेला.  लहानपणाची डोंबिवली ही फारच मस्त होती. एक चांगलं गाव होतं ते, बरचसं गाव आणि शहर याच्यामधे असणारं पण गावाच्या जवळ जाणारं. छोटे छोटे रस्ते, बंगले, कौलारू घरं, दोन किंवा काही ठिकाणी तीन मजली इमारती, रस्त्याच्या बाजूला झाडं, गावात मधे मधे दिसणारी भातशेते, रामबाणाची आणि उंच गवताने भरलेल्या काही पाणथळ जागा, हे सर्रास दिसणारं दृश्य होतं.
माझे आई वडिल नोकरी करत असल्याने आमची (मी आणि बहिण) रवानगी काकांकडे व्हायची. सकाळी थोडावेळ टाइमपास करून नंतर शाळेत दिवस जायचा. काका पेंडसेनगर मधे राहात असल्याने ते शाळेला जवळ होतं. तेव्हाचं पेंड़सेनगर खूपच वेगळे होते. बरीचशी बैठी घरं किंवा बंगले, आणि काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशा दोन किंवा तीन मजली इमारती. बराचसा भाग हा वापरात असलेल्या किंवा पडून राहिलेल्या भातशेतांचा. त्यामुळे खेळायला आणि फिरायला मजा यायची. मनुष्यवस्ती आत्ताच्या तुलनेत तर अगदीच कमी होती. बरीचशी माणसं एकमेकांना ओळखायची.
माझं बरचसं बालपण हे घरापेक्षा घराबाहेरच जास्त गेलंय. पूर्वी, सुदैवाने म्हणायला पाहिजे, टीवी, सिनेमा वगैरे फारसं प्रचलित नव्हतं, किमान आमच्या विश्वात तरी नव्हतं. त्यामुळे, शाळा सोडली तर बाकी काहीच व्याप नसायचा डोक्याला. काही मुलं शिकवणीला जायची (हल्ली ज्याला क्लासेस म्हटलं जातं ते), पण मी आणि आमच्या घरच्या लोकांना याची फार गरज वाटत नसल्याने तेही नव्हतं. त्यामुळे, शाळेव्यतिरिक्त असलेला वेळ हा खेळणं, फिरणं यात मस्त जायचा.
काका त्यावेळी एक बैठ्या चाळीत राहायचे. आजूबाजूला तशीच बैठी घरं आणि जवळच काही दोन मजली इमारती. त्यामागे नजर जाईल तोपर्यंत भातशेती. त्यावेळी बरीचशी लागवडीखाली पण होती. काही आंब्याच्या आणि पेरू, चिकूच्या बागा, जांभूळ आणि बोराची झाडं, चिंचेची काही प्रचंड मोठी झाडं, असा सगळा परिसर होता. बारा बंगला ते बावन चाळ आणि आजूबाजूच्या परिसरात चालत किंवा सायकलने फिरायला जाणं हा अत्यंत आवडीचा उद्योग होता.
घराच्या समोरच एक गोठा होता आणि बाजूच्या गल्लीतही एक गोठा होता. त्यामुळे, तिथे जाऊन म्हशी आणि गाईचं निरिक्षण करणं, दूध काढणं वगैरे गोष्टी बघणं हा वेळ घालवण्याचा एक उद्योग होता. त्या गोठ्याच्या बाजूला एक छोटा तलाव होता.
दोन इमारती सोडून एक मोठी विहीर होती. त्यात परिसरातील बहुतांश मुलंमुली, तरुण, मध्यमवयीन, सगळेच पोहायला जात असत. मीही कधी कधी जात असे पण शेवटपर्यंत पोहायला काही नीट जमलंच नाही. पण ते सर्व वातावरण एकदम छान असायचं.
त्यावेळी बरेचसे खेळ हे घराबाहेर खेळले जात. क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ होता हे खरं, पण आम्ही ऋतुप्रमाणे खेळ खेळत असू. म्हणजे पावसाळा असेल तर भिजत क्रिकेट आणि फुटबॉल खेळायला मजा येत असेच पण आजूबाजूला भरपूर शेतांमुळे छोटी लोखंडी शिग घेऊन रुपवारुपवी हा खेळ खेळला जायचा. पावसाळ्याव्यतिरिक्त ऋतुमधे अनेक मैदानी खेळ खेळले जात असत. त्यात कबड्डी, खोखो, वॉलीबॉल हे खूप कॉमन होते.
मी तर कर्जतहून मामाकडून विटी दांडू करून घेऊन येत असे आणि मग शाळेत आणि नंतर घराच्या अंगणात खेळायला खूप धमाल यायची. त्याव्यतिरिक्त गोट्या हासुध्हा एक लोकप्रिय खेळ होता.
वेगवेगळ्या ऋतूंमधे चिंच, आवळा, आंबे, बोरे, पेरू, जांभळे वगैरे झाडं शोधून त्यावर चढून फळे काढून खायला मजा यायची. मला आठवतय की शाळेत असताना मधल्या सुट्टीत बाजूच्या गल्लीतल्या एक चिंचेच्या प्रचंड झाडावर चढून आम्ही चिंचा काढत असू.
आमची शाळा (स. वा. जोशी विद्यालय) छान होती. दोन छोट्या इमारती आणि चौफेर खेळण्यासाठी मैदान. मैदानी खेळांची आवड आणि अनेक स्पर्धांमधे सहभाग या गोष्टी शाळेमुळे सहज घडून गेल्या. त्याचा खूप चांगला परिणाम झाला एकूण आयुष्यावर, पण तेव्हा कळलंच नाही. तेव्हा फ़क्त मजा वाटायची. त्या सर्व गोष्टी मधून खूप शिकायला मिळत गेलं जे आत्ता जाणवतं.
आजुबाजुला काँक्रीटचं जंगल नव्हतं तर खरी झाडं भरपूर होती. त्यामुळे झाडं ओळखता येत असत. त्याचा फायदा अजूनही होतो. श्रावण महिन्यापासून वेगवेगळे सण सुरु होत. तेव्हा आजच्या तुलनेत धार्मिक भावना वेगळी होती.  आमच्याकडे गणपती कोकणातल्या घरी असायचे पण मला अजुन आठवतय की श्रावण भाद्रपद महिन्यात 'पत्री" गोळा करणं, रोजच्या पूजेसाठी फुलं गोळा करणं, यामुळे आमचं लक्ष चौफेर असे. तगर, डबलतगर, पारिजातक, जास्वंद, गुलाब, मोगरा, हजारी मोगरा, चाफा, सोनटक्का, शेवंती, अनंत, कोरांटी ही आणि अशी अनेक फुलझाडं लक्षात राहिली.
रस्त्याच्या बाजूला आणि अंगणात असलेली बकुळ, आकाशजाई (बुचाची फुलं), कदंब, करंज, सावर, पांगारा, पापडी, नीलगिरी, हाताला आणि डोक्याला लावतात ती मेंदी, कुंपणाला लावलेली कडू मेंदी, सागरगोटा, निवडुंग, अडुळसा, शेवगा, वड, पिंपळ, उंबर, गुलमोहर, पेरू, चिकू, सीताफळ, रामफळ वगैरे झाडं सहज दिसायची.
कवठी चाफा, कैलासपती, शमी अशी काहीशी दुर्मिळ दिसणारी झाडंही दिसत असल्याचं आठवतं.
या सर्व हिरवाई मुळे संपन्न पक्षी आणि कीटक जग बघायला मिळत असे. स्वर्गीय नर्तक, हळदू, तांबट, शिंपी, सुतार, घार, कोतवाल, खाटिक, पोपट, वेडा राघु, खंड्या, भारद्वाज, वगैरे अनेक पक्षी, असंख्य प्रकारचे कीटक आणि फुलपाखरं हे सर्व रोजच्या जीवनाचा भाग होते. लहान असताना मला आठवतय की नवरे कंपाउंड मधे मी मोर नाचताना पाहीलाय
शेतांमुळे साप भरपूर दिसत. पण त्याचा कधीच त्रास झाला नाही. ते आपणहून जात किंवा घरात शिरले तर त्यांना पकडून बाहेर सोडत असू. मारण्याचं प्रमाण तसं कमी होतं.
एकूण जीवनशैली अशी होती की त्यामुळे आपण आजूबाजूच्या पर्यावरणाशी सहज जोडले जायचो. निसर्गाशी चांगला संपर्क आणि संवाद होता. यातून निसर्गचक्र अजाणतेपणी मनात कोरलं गेलं असावं असं आता वाटतं.
हा काळ साधारण 1975 ते 1982 पर्यंतचा. पण त्यानंतर अचानक जसा "विकास" वेगाने व्हायला लागला आणि शहरीकरण जोरात सुरु झालं, तसे त्याचे परिणाम मानवी स्वभाव आणि पर्यावरण, या दोन्हीवर दिसायला लागले आणि गावाचं रूप आणि स्वरुप बदलायला लागलं. (क्रमशः)
(महाराष्ट्र टाइम्स, ठाणे प्लस, २७.११. २०१६)