Sunday 13 May 2018

सरकारी आणि खाजगी पातळीवरील पावसापूर्वीची संधारणाची कामं - मृगजळ आणि वास्तव

सरकारी आणि खाजगी पातळीवरील पावसापूर्वीची संधारणाची कामं - मृगजळ आणि वास्तव 
 

दरवर्षी पावसाळ्याच्या आधी ग्रामीण भागांत शेती, जंगल आणि तत्सम इतर परिसरांत मृद संधारण आणि जल संधारण यासाठी सरकारी पातळीवर आणि स्वयंसेवा संस्थांच्या पातळीवर अनेक कामं युद्ध पातळीवर घेतली जातात. 
पूर्वी, रोजगार हमी योजनांमधून ही कामं केली जात आणि त्यात माणसाच्या हाताला काम हे अपेक्षित असे, प्रत्यक्ष काम मर्यादित स्वरुपात होत होतं, त्यामुळे माती आणि दगड यांचं विस्थापन कमी होत असे आणि त्या विभागातील भौगोलिक परिस्थिती (topography) फारशी बदलण्याचा धोका नसे किंवा तो अगदी मर्यादित असे.
सध्या, यंत्र (JCB, Poclain) वापरण्याचा उत्साह भयंकर (शब्दशः) वाढला असून, वाढत्या यांत्रिक वापरामुळे त्या त्या भागातील माती आणि दगड यांचं विस्थापन हे प्रचंड प्रमाणात वाढतंय. यात अनेक प्रकारच्या संस्था आढळतात,
अ. वेगवेगळ्या सामाजिक काम करणाऱ्या, 
ब. करण्याची इच्छा असलेल्या पण काय करायचं त्यातील तांत्रिक ज्ञान नसलेल्या (आणि असं काही असतं याची जाणीव अजिबात नसणाऱ्या) आणि, 
क. तसं काम करतोय असा गैरसमज असणाऱ्या स्वयंसेवी संस्था, 
हे सर्वजण सध्या विविध उद्योगपती, दानशूर व्यक्ती, स्वघोषित तज्ञ, या लोकांच्या प्रेरणेने (म्हणजे काय कोण जाणे) आणि यंत्रांच्या मदतीने ग्रामीण भाग अक्षरशः नांगरून काढताना दिसत आहेत. मग तो सपाटीचा भाग असो, किंवा डोंगर उतार, पठार असो किंवा भातशेतीची खाचरं, गावालगतचा भाग असो किंवा दूर जंगलातील, कशाचा कशाला संबंध दिसत नाही. फक्त टार्गेट पूर्ण करणं किंवा एखादी स्पर्धा जिंकणं एवढाच हेतू दिसतो. आपल्याला या विषयातील काही ज्ञान आहे का, आपला याचा अभ्यास आहे का, काही अनुभव आहे का, आपण करतोय ते बरोबर आहे का, त्याची त्या भागात गरज आहे का, आपल्यामुळे काही नुकसान तर होणार नाही ना,  यातील किती प्रश्न या स्वयंप्रेरित लोकांना पडतात तेच जाणे.
मृद संधारण आणि जल संधारण या दोन्ही गोष्टी स्थालानुरूप असल्या तरच त्याचा अपेक्षित फायदा मिळतो आणि नुकसान होत नाही हे यापैकी खूप लोकांच्या मनातही येत नाही हा किमान माझा तरी अनुभव आहे. ही कामं करण्यासाठी अभ्यास लागतो, तो प्रत्येक ठिकाणी वेगळा करावा लागतो, एका ठिकाणची योजना दुसऱ्या ठिकाणी अभ्यास न करता कॉपी केली तर त्या गावाचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं, इत्यादि गोष्टींचा विचार करायची गरजही न यातल्या बहुसंख्य संस्थांना वाटते, ना गावातल्या लोकांना वाटते. आणि गंभीर बाब म्हणजे, यात काम करणारे आणि न करणारे बहुसंख्य तज्ज्ञही काही अनाकलनीय कारणांमुळे या विषयावर गप्प बसून चाललेलं नुकसान बघत बसलेले दिसतात. 
हे दृश्य राज्यभर दिसतं. अगदी कालच शहापूर भागात भातसा धरणाच्या परिसरात हे काल पाहिलं आणि लिहील्यावाचून राहवलं नाही म्हणून हा लेख.
त्या गावाला भयंकर पाणी टंचाई जाणवते, म्हणून एका रोटरी क्लब बरोबर काल सर्वेक्षणासाठी गेलो होतो. गाव एका पठारावर, एका कडेला वसलेलं. सगळ्या बाजूंनी उतार. त्यामुळे वर वर्षभर पुरेल इतकं पाणी कुठेच अडवता येणं  जवळ जवळ अशक्य. वरच्या पठारावर गावालगत लोकांची थोडी थोडी शेती (माती आणून टाकून तयार केलेली). गावाला पाणी पुरवणाऱ्या विहिरी खाली दरीत, चांगलं दीड किमी अंतरावर आणि ३०० फूट खाली उतरून गेल्यावर. त्या पायवाटेवरून जाताना दिसलेली ही सरकारी करामत! सोबत जोडलेल्या फोटोत सहज दिसेल.
जिथे दरवर्षी अडीच हजार ते तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो, तिथे या गावात लोकांच्या शेतांमध्ये बांधाच्या ठिकाणी शेतातील माती यंत्राने खरवडून काढून टाकली आहे. मुळात, इथे माती खूप कमी शिल्लक आहे. बेसुमार वृक्षतोड केल्यामुळे बरीच माती वाहून गेलीय. जी थोडी शिल्लक आहे, त्यात लोक शेती करतात. आता, त्यातील माती खरवडून काढून बांधावर लावली आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी मुरूम उघडा पडलाय. आता, पावसाळ्यात काय होणार तर जोराच्या पावसाने माती वाहून जाणार खाली ओढ्यात आणि शेवटी भातसा धरणात. आणि उघड्या झालेल्या मुरुमातून पाणी मुरून खाली निघून जाणार. म्हणजे या अप्रतिम योजनेतून आपण काय साध्य करणार? तर त्या शेतकऱ्याच्या शेतातील माती कायमस्वरूपी वाहून जाणार आणि शेतीचा कस आणखी कमी होणार, माती वाहून जाऊन खालच्या धरणात साठणार आणि लोकांची पाण्याची समस्या तर कायम राहणारच पण नवीन मातीची समस्या उद्भवणार.
आणि हे दृश्य त्या परीसारांतच नाही तर अगदी मराठवाड्यातही दिसतं. कारण, आपल्याकडे अशा योजनांमध्ये त्या भागातील हवामान, पाऊस, भौगोलिक परिस्थिती, चढ उतार, मातीची खोली, वगैरे गोष्टी विचारात न घेताच सगळीकडे एकाच प्रकारच्या उपायांनी ती समस्या सोडवायचा प्रयत्न होतो. 
जर आपल्याला काम करून अपाय न करता योग्य उपाय करायचा असेल तर असं वागून चालणार नाही. पाणी आणि मृद संधारण करताना वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींचा विचार आणि अभ्यास करून स्थालानुरूप काम करावं लागेल, तरंच त्याचा दूरगामी फायदा दिसेल. 
अन्यथा, ही केवळ एक स्पर्धा समजून जास्त काम म्हणजे जास्त छान काम असं समजून काम केलं किंवा योग्य अभ्यासाशिवाय मनाला वाटेल ते काम केलं तर त्यातून तात्पुरतं खोटं समाधान मिळू शकेल, आपण चार दिवस फोटो सगळीकडे टाकून धम्माल करू शकू, पण त्यात त्या बिचाऱ्या गावकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार कोणी करायचा? ते कदाचित कायमस्वरूपी असू शकतं.
तेव्हा या कामांमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांना हात जोडून विनंती, की कृपया अभ्यास करून, योग्य स्थालानुरूप योजना आखून मोजकं पण योग्य आणि शाश्वत काम करा. आपली अतिउत्साहामुळे एखाद्या गावाचं नुकसान तर होत नाहीये ना याची खात्री करून घ्या. आणि ही संधारणाची कामं स्थालानुरूप असतात आणि प्रत्येक ठिकाणी अभ्यास करून करायची असतात, हे लक्षात ठेवा.
डॉ. उमेश मुंडल्ये