सावध ऐका पुढच्या हाका....
एकांगी शहरकेंद्रीत भौतिक विकास आपल्याला कुठे घेऊन जातोय हे
एकदा शांतपणे बसून विचार करून बघितलं पाहिजे असं आपल्याला वाटतं का?
“अज्ञानात सुख असतं”, ही म्हण किती
खरी आहे, हे विचार करायला लागल्यावर आपल्याला पदोपदी जाणवत राहतं. कित्येक महत्त्वाच्या
गोष्टींची आपल्याला जाणीवच नसते, इतके आपण आपल्या विश्वात गुंगून गेलो असतो. आणि
मग अचानक एक दिवस मोठं फटका मिळाला की परत निसर्ग, पर्यावरण, नैसर्गिक स्त्रोत
यांच्या नावाने खडे फोडत राहतो. आपली काही चूक असू शकते याची जाणीव असल्याचं
बहुसंख्य लोकांच्या प्रतिक्रियांवरून वाटत नाही.

पुरी जिल्ह्यातील उदयकानी नावाचं गाव लांबून पाहिलं तर काही
वेगळेपणा जाणवत नाही. भरपूर वृक्ष, टुमदार घरं आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा
यामुळे गाव छान दिसतं, पण गावातल्या लोकांशी बोललं की कळतं, समुद्राने
जमीन गिळंकृत केल्यामुळे गाव तीनवेळा आतमध्ये विस्थापित होतंय.
एकूणच, ओरिसामधील समुद्रकिनाऱ्याच्या ३०% पेक्षा जास्त किनाऱ्यावर समद्राच्या आक्रमणाचा दबाव आहे. समुद्राच्या पाणी पातळीमधे होत असलेली वाढ यासाठी कारणीभूत आहे. २०१४ मधे केलेल्या संशोधनातून अशी माहिती मिळते की ओरिसामधील १०% समुद्रकिनाऱ्याची जमीन या आक्रमणांमुळे धोक्यात आली आहे.
एकूणच, ओरिसामधील समुद्रकिनाऱ्याच्या ३०% पेक्षा जास्त किनाऱ्यावर समद्राच्या आक्रमणाचा दबाव आहे. समुद्राच्या पाणी पातळीमधे होत असलेली वाढ यासाठी कारणीभूत आहे. २०१४ मधे केलेल्या संशोधनातून अशी माहिती मिळते की ओरिसामधील १०% समुद्रकिनाऱ्याची जमीन या आक्रमणांमुळे धोक्यात आली आहे.

केंद्र शासन या प्रश्नावर उपाय करण्यासाठी प्रयत्न करत आहे. २०१६ मधे संसदेत माहिती देताना सरकारने सांगितलंय की, या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक हवामान बदलांमुळे भारतातील समुद्राची उंची ३.५ इंच पासून सुमारे ३४ इंचांपर्यंत वाढेल (जवळपास ३ फूट) असं अनुमान आहे.
हे समुद्राचं पाणी आत येतं तेव्हा फक्त जमीन गिळंकृत करतं असं नाही, तर भूजलसाठा क्षारयुक्त होतो, शेतजमीन खराब होते, त्यामुळे शेती करणं अशक्य होतं, झाडं वाढत नाहीत, आहेत ती मरतात. पिण्यायोग्य पुरेसं पाणी नसल्याने, क्षारयुक्त पाणी वापरल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. स्थलांतर करण्याची वेळ येते. अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात.
ज्या सातभाया गावाबद्दल आपण बोलतोय, त्याची परिस्थिती फारच वाईट आहे. सातपैकी सहा गावं समुद्राने गिळंकृत केली आहेत. परिस्थिती इतकी वाईट आहे की सरकारने पुनर्वसन करताना १२ किमी लांब जागा निवडली आहे. या भागात होणारं समुद्राचं आक्रमण थोपवण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण भिंत बांधण्याचा प्रयोगही झाला आहे. हा प्रयोग पेंथा नावाच्या गावात झाला. १ किमी लांबीची भिंत यात बांधली गेली. २०१६ मधे हे काम पूर्ण झाल्यानंतर आक्रमण एकदम कमी झालं असं लोकांचं निरीक्षण आहे. पण या १ किमी लांब भिंतीला अंदाजे ४५ कोटी रूपयांच्या आसपास खर्च आला. आणि अशी भिंत केवळ वस्ती वाचवू शकते, पर्यावरणाच्या इतर घटकांना उपयोग होत नाही, तिथली जीवसृष्टी वाचवणं शक्य होत नाही. त्यामुळे आणि एकूण खर्चाचा विचार केला तर हे व्यावहारिक दृष्ट्या यशस्वी होणं जवळपास अशक्य आहे.
लोकसहभागातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणं, मॅनग्रुव्हज्
जपणं, वाढवणं, त्याचा उपयोग
करून नवीन रोजगार संधी उपलब्ध करणं, इत्यादी अनेक उपाय चालू आहेत आणि त्याचा
सकारात्मक परिणामही दिसतोय. सातभाया गावातील फोटो पाहिले तर आपण थक्क
होतो. एकेकाळी (काहीच वर्षांपूर्वी) गावाच्या मधोमध असलेल्या बोअरवेल्स आत्ता
आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर रेतीमधे उभ्या असलेल्या दिसतात. गावं उठून गेली आहेत, शेतजमीन गायब
झाली आहे, दिसतेय ती
फक्त वाळू!

जर समुद्रकिनारा सुरक्षित राखायचा असेल आणि समुद्राच्या
वाढणाऱ्या उंचीला लांबवायचं असेल तर पर्यावरण संतुलन अनिवार्य आहे. जमीन राहिली तर
त्यावर विकास करता येईल, अन्यथा, तेल, तूप गेलं, हाती धुपाटणं राहिलं ही वेळ येणार आहे.
डॉ. उमेश मुंडल्ये
(छायाचित्रे - आंतरजालावरून)